5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम
। मुंबई । प्रतिनिधी ।
प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या स्क्रॅप आणि नियमबाह्य रिक्षांविरोधात राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. 5 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबवून कारवाईचा आढावा सादर करण्याचे आदेश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत.
स्क्रॅप घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा प्रवासी वाहतुकीसाठी वापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी तसेच नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाईसह आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. स्क्रॅप रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव तसेच विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून नियमबाह्य आणि धोकादायक वाहनांना प्रवासी वाहतुकीची कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा ईशाराही सरनाईक यांनी दिला. अधिकृत आणि सुरक्षित वाहनांनाच प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात येणार असल्याचे सरनाईक म्हणाले.






