विधानपरिषदेत सत्ताधारी, विरोधकांमध्ये वादावादी
| मुंबई | प्रतिनिधी |
खा. संजय राऊत यांच्याविरोधात सत्ताधार्यांकडून दाखल झालेल्या हक्कभंगाला प्रतिआव्हान म्हणून गुरुवारी विरोधी ठाकरे गटातर्फे विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विरोधी सदस्यांना देशद्रोही असे संबोधल्यावरुन विशेष हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाली.
गुरुवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब आदींनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विशेष हक्कभंग प्रस्ताव उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्याकडे सादर केला. तो त्यांनी स्वीकारला. मात्र तो स्वीकारत असतानाच त्यांनी याबाबत खुलासा करण्याची मुभा मुख्यमंत्र्यांना दिल्याने ठाकरे गटाचे आमदार संतप्त झाले. हा प्रस्ताव हक्कभंग समितीपुढे सादर करुन त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणे मांडावे, असा मुद्दा अनिल परब यांनी मांडला. तरीही गोर्हे यांनी शिंदे यांना आपले म्हणणे मांडण्यास अनुमती दिली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मी नवाब मलिकांना देशद्रोही म्हटलं होतं असं स्पष्टीकरण दिलं आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं, असं म्हणत टीका केली. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री मला देशद्रोही म्हणाले, असा आरोप करत त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. यावर आज विधानपरिषदेत सभापतींच्या परवानगीने मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या विधानाबद्दल खुलासा केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्या पत्रकार परिषदेत अजितदादांना देशद्रोही म्हणालो नव्हतो हे माझं वक्तव्य अजित पवार, अंबादास दानवे यांच्याबद्दल नव्हतो. मी जे बोललो ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल होते. मलिक यांच्यावर एनआयए, ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यावरुन ते वक्तव्य केल्याचे शिंदे म्हणाले.