सलग मार्गासाठी 30 व 50 किमीची मर्यादा
| सुधागड-पाली | वार्ताहर |
नुकताच रुंदीकरण झालेला वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर चिवे फाटा ते घोड्याचा डोह यादरम्यान लावण्यात आलेले वेगमर्यादेचे फलक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या सलग मार्गावर खोपोलीकडे जाण्यासाठी 30 किमी व पालीकडे जाण्यासाठी 50 किमीची मर्यादा दिली आहे. मात्र, ही वेगमर्यादा नियमात नसल्याचे व त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना गैरसोय होत आहे. शिवाय, हकनाक दंड बसत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
याबाबत पालीतील वकील नोएल चिंचोलकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य, मुंबई महाराष्ट्रातील रस्त्याकरिता वाहनांच्या वर्गानुरूप अनिवार्य करण्यात आलेली वेगमर्यादा राज्य महामार्गावर 2 किंवा जास्त मार्गिकेचे विभाजक नसलेल्या रस्त्यासाठी समतल भागाकरिता 70 ते 60 किमी प्रतितास व घाट रस्त्यासाठी 40 किमी प्रतितास इतकी वेगमर्यादा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. असे असतानाही पाली-खोपोली राज्य महामार्गावर देण्यात आलेली वेगमर्यादा ही नियमांना धरून नाही आहे. शिवाय सलग रस्त्यावरून येणारी वाहने वेगात असतात. अशावेळी अचानक आलेले कमी वेगमर्यादेचे फलक पाहून लागलीच वाहनांना इतका वेग कमी करणे शक्य नसतो. यामुळे अपघातदेखील होऊ शकतो. तसेच अचानक आलेले हे फलक न दिसता वेगमर्यादेचे पालन न झाल्यास पोलिसांच्या कारवाईच्या बडग्याची भीती आहे. त्यामुळे एमएसआरडीसी प्रशासनाने वेगमर्यादा फलक शासन नियमानुसार करावेत, असेदेखील ॲड. नोएल चिंचोलकर यांनी सांगितले.
या वेगमर्यादा फलकांबाबत कल्पना नाही आहे. यासंदर्भात माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू.
सचिन निफाडे, उपभियंता, एमएसआरडीसी