मुंबई पर्यंतचा प्रवास खिळखिळ्या एसटीतून
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आता आगाराला नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण लागले आहे. दोन महिन्यांमध्ये चार वेळा खराब बसेस प्रवासात बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता बुधवारी (दि.14) खिळखिळी झालेली बस मुंबईसाठी सोडण्यात आल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीवर्धन आगारात खिळखिळ्या बनलेल्या वाहनांकडे महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. या एसट्या मध्येच रस्त्यात बंद पडण्याचा प्रसंग अनेक वेळा समोर आला आहे. कधी सेंटर बोल्ट तुटल्याने गाडी बंद पडते. तर, काही वेळा मागील चाकाचे नट बोल्ट निघाल्याने गाडी जागेवरच थांबली आहे. आशा घटना ग्रामीण भागात धावणार्या गाड्यांमध्ये सतत घडत असतात. त्याच अवस्थेत खेड्यापाड्यातील चालणारी एसटी बुधवारी श्रीवर्धन येथून मुंबईत सोडण्यात आली. त्यातच, या गाडीतील सर्व सिट आरक्षित झाल्या होत्या. तरीदेखील अधिकच्या प्रवाशांना उभे करून ही बस मुंबईकडे सोडण्यात आली. अशा बसमध्ये सुखकर प्रवास कसा होणार, असा संतप्त प्रश्न प्रवासी करत आहेत. तसेच, एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी असताना देखील एसटीच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने आता श्रीवर्धन आगाराचा प्रवास रामभरोसे असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून उमटत आहेत.