। अलिबाग । वार्ताहर ।
देशातील सर्वच राजकीय पक्ष चोर्या, मार्या करुन सत्ता हस्तगत करीत असताना जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. अशावेळी जनहितासाठी लढणार्या शेकापच्या सारख्या चळवळीच्या पक्षामागे जनतेने ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा स्वाभीमानी शेतकरी संघटेचे अध्यक्ष माजी खा.राजू शेट्टी यांनी यावेळी केले.
देशातील सत्ताधार्यांकडून जनतेसाठी चळवळी करणारे पक्ष संपुष्टात आणले जात आहेत. अशा परिस्थितीतही रायगडात शेकापने आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले आहे. सांगोल्यात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनीही शेकापला जिवंत ठेवण्याचे काम केेलेले आहे. भविष्यातही रायगडसह महाराष्ट्रात शेकापला उर्जितावस्था आणण्याचे काम कार्यकत्यांना करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.
सत्ताधार्यांच्या कार्यपद्धतीवरही शेट्टी यांनी जोरदार हल्लाबोल केला. मविआ सरकार स्थापन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकर्यांच्या हितासाठी निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्या सरकारमध्ये स्वाभिमानीसह शेकापसुद्धा सहभागी झालेला होता. पण नंतर मविआकडून कोणत्याच प्रकारची आश्वासने पाळली गेली नाही. जनतेचा पूर्ण भ्रमनिराश मविआने केला. त्यामुळे आम्ही त्या चोरांच्या टोळीत सहभागी झालो होतो अशी आमची खात्री झाली, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
पेण तालुक्यातील सेझ प्रकल्पाच्याविरोधात शेकापने उभारलेल्या संघर्षाचाही शेट्टी यांनी आवर्जून उल्लेख केला. कर लो दुनिया मुट्टी मे असे सांगणार्या अंबानीसारख्या बड्या उद्योगपतीलाही येथील शेतकर्यांनी एकजुटीने पळवून लावले तो एक ऐतिहासिक असाच लढा होता. भविष्यातही असे लढे पुन्हा तुम्हाला द्यावे लागणार आहेत. येथील जमिनीवर राज्यकर्ते आणि बड्या उद्योगपतींची नजर आहे.अशावेळी एकजुटीने लढा देण्यासाठी शेकापला बळ द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
वाढत्या महागाईबाबतही शेट्टी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाला प्रचंड गाजावाजा करुन उज्वला गॅस सिलिंडर दिले खरे,पण आतापर्यंत 3 कोटी 59 लाख गॅस धारकांनी पुन्हा एकदाही तो सिलिंडर भरुन घेतलेला नाही. कारण तो सिलिंडर भरुन घेण्यासाठी त्यांच्याकडे तेवढे पैसे देखील नाहीत. हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही,असे त्यांनी निदर्शनास आणले.
देशातील आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रातील दुरवस्थेबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जीएसटी वाढविल्याने शैक्षणिक साहित्य महागले आहे. तर आजारी पडलेल्यांना खाजगी रुग्णालयातील दर न परवडणारे असून,सरकारी रुग्णालयांची अवस्था अत्यंत शोचनिय असल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. शेकापसारख्या चळवळीतील पक्षाचा केवळ चळवळीपुरता वापर करुन घेऊ नका, त्यासाठी पक्षाला आपल्या मताचे बळ देखील द्या तरच तो पक्ष टिकेल, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.