। उरण । वार्ताहर ।
समुद्र मार्गी दहशतवादी हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहेत. तसेच उरण तालुक्यातील करंजा परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असतानाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी असलेली पोलीस चौकी गायब करून त्याठिकाणी सपाटीकरण करून ती जागा बळकविण्याचा घाट सुरू आहे. तरी या परिसरातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी करंजा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्र व्यवहारद्वारे केली आहे. करंजा गावची लोकसंख्या आता 25 ते 30 हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यात करंजा परिसरालगतच द्रोणागिरी नोडची उभारणी होत इमारतींचे जाळे विणले जात आहे. त्यामुळे भविष्यात उरण पोलीस ठाण्यावर त्याचा अतिरिक्त भार पडेल. तसेच समुद्रमार्गे होणारे दहशतवादी हल्ले विचारात घेता करंजा गावातील गेली अनेक वर्षे बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावी. अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.






