। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे शेकाप आ.जयंत पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणले आहे. तसेच याबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुमारे 1 हजार 549 शाळांचा वीज पुरवठा महावितरणाने खंडीत केला असून, 679 शाळांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी तर 800 शाळांचे कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहे. विविध तालुक्यातील केवळ 567 शाळांचा वीजपुरवठा सुरळीत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून चालणार्या शाळांना वीज देयकाचा भरणा करण्यासाठी राज्य शासनाने अनुदान दिले आहे. वीज देयकांसह शाळांचा दैनंदिन खर्च करण्याकरीता जिल्ह्यातील किती शाळांना अनुदानापोटी किती रक्कम अदा करण्यात आली आहे. याप्रकरणी शासनाने चौकशी करुन कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, अशी विचारणा आ. जयंत पाटील यांनी लेखी स्वरुपात केली आहे.
याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, रायगडातील शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा तात्पुरता वीज पुरवठा खंडित केलेल्या 347 शाळांची व कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत केलेल्या 590 शाळांची वीज देयकाची रक्कम अदा करण्यासाठी 50.70 लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा निधी वीज वितरण कंपनीस अदा करण्यात आला आहे. अनुदान मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदांना मागील वर्षी दिलेल्या अनुदानाचे निर्धारण करणे आवश्यक असते. रायगड जिल्ह्यातील शाळांचे अनुदान निर्धारण पूर्ण झाले नसल्याने, सादील अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले नाही. रायगड जि.प.चे अनुदान निर्धारण पूर्ण होताच दैनंदिन खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी लेखी स्वरुपात दिली आहे.