महाड गांधारी नाका ते क्रांतीस्तंभापर्यंत काळोख
। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरात गांधारी नाक्याहून क्रांतीस्तंभमार्गे छ. शिवाजी महाराज चौकाकडून येणार्या रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने रात्री-अपरात्री या निर्जन रस्त्यावरून ये-जा करताना चाचपडत जावे लागत आहे. महाड नगरपरिषदेने या मार्गावरील पथदिवे तातडीने सुरु करावेत, अशी मागणी सिद्धी शिंदे यांनी केली आहे. महाड शहरातील गांधारी नाका ते दस्तुरी नाक्यापर्यंत बनवण्यात आलेल्या मार्गाला महाडचा पामबीच मार्ग असे संबोधले जाते. रस्त्याच्या मधोमध असलेले दुभाजक आणि त्यावरील पथदिवे यामुळे रात्री हा रस्ता प्रकाशाने उजळून जात असतो. रात्री या रस्त्यावरून शतपावली करणार्यांची संख्याही जास्त असते. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गवरील पथदिवे बंद असल्याने रात्री या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे शतपावली करणार्या महाडकरांना चाचपडत जावे लागत आहे. पावसाचे दिवस असल्याने साप, विंचू असे जनजनावर या रस्त्यावर येऊन अंधारात जाणार्या-येणार्याला दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निर्जन असणार्या या रस्त्यावरून रात्री एकटा दुकट्याला दुचाकीवरून जाण्यास भीती वाटत असते. महाड नगरपरिषदेने या मार्गावरील पथदिवे सुरु करावेत, अशी मागणी सिद्धी शिंदे यांनी मुख्याधिकारी महाड यांना पत्र पाठवून केली आहे.