बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीची लगबग; 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सव्वा महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार (दि. 15) पासून जिल्ह्यातील शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी उत्सुक झाले असून, शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने जिल्ह्यातील अलिबागसह प्रमुख बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीची लगबग वाढली आहे. पुस्तके, वह्या, दप्तर, कंपास, गणवेश आणि अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी दुकानदारांकडे पाहायला मिळत आहे.
एप्रिलअखेर परीक्षा संपल्यानंतर एक मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्यात आली होती. 14 जूनपर्यंतच्या या सुट्टीत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत मूळगावी जाणे, नातेवाईकांकडे मुक्काम करणे, क्रिकेट, गोट्या यांसारख्या पारंपरिक खेळांचा आनंद घेणे अशा विविध उपक्रमांत सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी सुट्टीचा कालावधी अभ्यास, शिकवणी वर्ग आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही वापरला.
आता नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून शालेय साहित्य खरेदीला सुरुवात झाली असून, सध्या खरेदीचा अंतिम टप्पा सुरू असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. जिल्ह्यातील अलिबागसह अन्य बाजारपेठांमध्ये पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर, गणवेश आणि अन्य साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, यंदा शालेय साहित्यांच्या किमतीत सरासरी दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला कात्री बसत आहे. वाढती महागाई आणि शैक्षणिक साहित्यांच्या वाढलेल्या दरांमुळे शालेय खर्चाचे आर्थिक गणित अनेक कुटुंबांना नव्याने मांडावे लागत आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत यासाठी शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले आहे. बालभारतीकडे पाठविण्यात आलेल्या मागणीनुसार पाठ्यपुस्तके जिल्ह्यात दाखल झाली असून, ती तालुकास्तरावरून केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी दोन दिवस शिक्षकांनी शाळांमध्ये उपस्थित राहून स्वच्छता, परिसर सुशोभीकरण आणि स्वागताची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विशेष उपक्रमही राबविले जाणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेत गावोगावी आणि घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधला आहे. जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. शाळांच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरात प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी आणि पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवेशोत्सवाने होणार स्वागत
जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शाळांच्या प्रवेशद्वारांना तोरणे लावली जाणार असून, परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. गावातून प्रभातफेरी काढून शिक्षणाबाबत जनजागृती केली जाणार आहे. शाळांच्या पहिल्याच दिवशी जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम
जिल्ह्यातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहा ते चौदा वयोगटातील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शिक्षकांसह सरपंच, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचतगट आणि ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून गृहभेटी घेऊन पालकांशी संवाद साधला जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
रायगड जिल्ह्यातील शाळांमधील तब्बल दोन लाख 256 विद्यार्थ्यांना शासनाकडून दहा लाख 89 हजार पाठ्यपुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापैकी आठ लाख तीन हजार 63 पुस्तके जिल्ह्याला प्राप्त झाली असून, उर्वरित पुस्तकांचा पुरवठा सुरू आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ही पुस्तके वितरित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.









