| मुंबई | वृत्तसंस्था |
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुनील कावळे ( वय 45 वर्ष ) असे त्याचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली. हा तरुण मूळाचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सुनील कावळे जालन्याचे रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्यांनी सर्वांची माफी देखील मागितली आहे. मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच त्याने आत्महत्या केल्याचा दावा आंदोलनाचे नेते विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपुर्वी मराठा आरक्षणासाठी तरुणाने केली होती आत्महत्या
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण असतानाच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील माडज येथील एका मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले पाहिजे यासाठी मनोज जरांगे यांनी लढा उभारला आहे. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारला आरक्षणावर विचार करून कृती करण्यासाठी दिलेली मुदत संपत आली आहे, सरकार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.