| माणगाव | प्रतिनिधी |
रस्त्याच्या दुतर्फा, रानात विविध फुलझाडे बहरली आहेत. विविध रंगांची गुलमोहोर फुलांनी बहरून आली असून, निसर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. निसर्गातील बदल हे पुढील ऋतूचे भाकीत करतात. त्यामुळे रानात बहरलेल्या फुलांवरून पावसाळा जवळ आल्याचे भाकीत ज्येष्ठ नागरिक करीत असून, समाधान व्यक्त करीत आहेत.
एप्रिल, मे महिन्यात उन्हाचा पारा चढत असताना रानावनात मात्र उन्हाळी रानफुलांचा बहर आला आहे. चैत्र महिन्यानंतर रानावनात झाडांना पालवी फुटली असून, या पालवीतच बहावा, निवडुंग, गुलमोहोर इत्यादी वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुलांचा बहर आला आहे. रानावनात झाडांना पालवीबरोबरच आलेला हा बहर निसर्गप्रेमी, पर्यटक यांच्या आकर्षणाचा विषय होत असून, निसर्गातील उन्हाळ्याच्या काहिलीत बहरणारी रानफुले निसर्गाची शोभा वाढवित आहेत.
उन्हाळा हा काहीसा उदासवाना ऋतू असतो. झाडांची पानगळ, उन्हाची वाढणारी काहिली व भकास वाटणारे रान असे काहीसे चित्र सर्वत्र दिसते. मात्र, याच ऋतूत रानातील अनेक फळझाडे, फुलझाडे फुलून येतात, यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात रानाची शोभा वाढत असून, रानावनात झाडांना उन्हाळी रानफुलांचा बहर आलेला दिसत आहे.
कोकणातील सह्याद्री पर्वताची कडे कपारीत, रस्त्यांच्या दुतर्फा, शेत शिवारात असंख्य प्रकारच्या फळ, फुल झाडांना पालवीबरोबरच फुलांचे गुच्छ आले आहेत. एरवी उन्हाळा रुक्ष उदास वाटतो, मात्र रानावनात फुलणार्या उन्हाळी रानफुलांनी निसर्ग उन्हाळ्यातही आपली शोभा कायम ठेवून सुंदरता कायम ठेवत असल्याचे निसर्गप्रेमी, पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत.
गुलमोहोर, उन्हाळी रानफुले बहरली
![](https://krushival.in/grygrars/2023/04/IMG-20230416-WA0001-e1681643583100-1024x896.jpg)