| पाली/बेणसे | वार्ताहर |
लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना सहावेळा निवडून देणार्या समस्त मतदारांचा सुनील तटकरेंकडून अपमान करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत विरोधात बोलताना तटकरेंनी भान ठेवावे असा इशारा अनंत गीते यांनी तटकरेंना दिला. अनंत गीते यांचे काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा या तटकरेंच्या टीकेला गीतेंनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.
प्रचारसभेतून सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करीत अनंत गीते यांचे एक काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी घोषणा जाहीर सभेत केली होती. या टीकेला अनंत गीते यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनंत गिते यांना जनतेने सहा वेळा निवडून दिले आहे. सुनील तटकरे यांना याचे भान नाही.ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तटकरे हे माझा नाही तर जनतेचा, मतदारांचा अपमान करीत आहेत. भान ठेवा. असा हल्लाबोल अनंत गीते यांनी केला. यावेळी अनंत गीते यांनी अलिबागच्या नामकरण प्रश्नावर देखील भाष्य केले. अलिबाग शहराचे मायनाक नामकरण करण्यात यावे अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. यावर गीते म्हणाले की नाव बदलणे, सुचविणे हा अधिकार सर्वांना. प्रत्येक नावामागे एक अस्मिता असते, मराठी माणूस आपल्या अस्मितेबद्दल कडवट असतो. अलिबागकर जनतेने निर्णय घ्यावा, असे गीते म्हणाले.
2024 ची निवडणूक विकासाच्या कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाते या प्रश्नावर गीते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशभर विकास शोधत आहेत.10 वर्षात विकास कुठे जन्माला आलेला दिसत नाही. पंतप्रधान विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवत नाहीत. ते वेगळ्या मुद्द्यावर निवडणुका लढवत आहेत. राज्यकर्ते म्हणून विकास करणे ही सत्ताधार्यांची जबाबदारी आहे.असे अनंत गीते म्हणाले. भाजप लोकसभेत 400 पार चा नारा देत आहे.ईडी, सीबीआय, आयकर यांची मदत घेत आहे. मुख्य पक्षात फूट पाडत आहे. या गलिच्छ राजकारणामुळे देशातील जनतेला आता शंका वाटत आहे कि देशात लोकशाही नष्ट होऊन हुकूमशाही येते की काय? असं वातावरण निर्माण झालं आहे. सत्ताधार्यांवरील जनतेचा विश्वास उडालेला आहे. महाराष्ट्रातील जनता येथील सत्ताधार्यांना धडा शिकवेल. या देशातील प्रत्येक नागरिकाला सत्ताधार्यांबद्दल शंका आहे. असं वातावरण निर्माण होणं हे या देशातील सत्तेचा, विशेष करून प्रधानमंत्री यांचा अवमान आहे. असे शेवटी अनंत गीते म्हणाले.