। पुणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा आज मंगळवार (दि. 24) पासून सुरू झाली आहे. यात दहावीच्या परीक्षेसाठी 34 हजार 562 आणि बारावीच्या परीक्षेसाठी 68 हजार 98 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी, श्रेणीसुधार करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी राज्य मंडळाच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक या नऊ विभागीय मंडळांमार्फत 24 जून ते 16 जुलै या कालावधीत पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 8 जुलै, तर बारावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 34 हजार 562 विद्यार्थ्यांमध्ये 24 हजार 245 मुले, 10 हजार 316 मुली, तर एका तृतीयपंथी विद्यार्थ्याचा समावेश आहे. तसेच, बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 68 हजार 98 विद्यार्थ्यांपैकी 45 हजार 144 मुले, 22 हजार 953 मुली, एक तृतीयपंथी विद्यार्थी आहे.
परीक्षेसाठी राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेप्रमाणे जून-जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेतही पेपरच्या नियोजित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिला आहे. तसेच, पुरवणी परीक्षेसाठी प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत, असेही कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.