ढाकच्या दुर्गम डोंगरकपारीत शिक्षकांची अथक मोहीम; जीव धोक्यात घालून जनगणना
| कर्जत | प्रतिनिधी |
देशाच्या जनगणनेसारख्या राष्ट्रीय कामासाठी शिक्षक किती कठीण परिस्थितीत काम करतात, याचे जिवंत उदाहरण कर्जत तालुक्यातील ढाक परिसरात पाहायला मिळाले. डोंगरकपारी, जंगलवाटा, जीवघेणा प्रवास आणि पावसाशी स्पर्धा करत शिक्षकांनी अखेर ढाक आणि कळकराई परिसरातील 100 टक्के घरगणना पूर्ण केली.
कर्जत तालुक्यातील ढाक हे अतिदुर्गम डोंगराळ भागात वसलेले गाव. येथे पोहोचण्यासाठी आजही वाहनमार्ग नसून, तीन ते चार तास पायी चालत जावे लागते. जनगणनेसाठी गेलेल्या शिक्षकांनी 22 मे 2026 रोजी सकाळी 5.22 वाजता डोंगर चढायला सुरुवात केली. तब्बल 4 तास 23 मिनिटांच्या खडतर प्रवासानंतर ते ढाक येथे पोहोचले आणि घरगणनेचे काम पूर्ण केले. मात्र, त्यानंतरही त्यांचा प्रवास संपला नव्हता. ढाक बहिरीच्या कड्याखालील कळकराई या वाडीपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा दीड तासाची जीवघेणी पायपीट करावी लागली. अखेर तब्बल 12 तास 7 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर संपूर्ण घरगणना 100 टक्के पूर्ण करण्यात यश आले.
काम पूर्ण करून संध्याकाळी 4.29 वाजता त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, लोणावळा-खंडाळा घाट परिसरात पावसाचे संकेत मिळत होते. जनगणनेत गोळा केलेले महत्त्वाचे दस्तऐवज आणि ऑनलाईन डेटासाठीचे मोबाईल सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे जीव मुठीत धरून त्यांनी अवघ्या एका तासात धोकादायक डोंगर उतरत माणगाव वासरे आदिवासी वाडीत आश्रय घेतला. विशेष म्हणजे, घरात पोहोचताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मोहिमेदरम्यान जंगलातील पायवाटा, खोल दऱ्या, कडे-कपारी आणि सततचा धोका यामुळे अनेक थरारक प्रसंग शिक्षकांना अनुभवावे लागले.
दरम्यान, 19 मे रोजी पहिल्यांदा जनगणनेसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी अर्ध्या वाटेत अडवले होते. टोरांटो प्रकल्पाशी संबंधित कर्मचारी असल्याचा गैरसमज झाल्याने ग्रामस्थांनी गावात प्रवेश नाकारला होता. ही बाब पर्यवेक्षक वेच्या गावित यांनी तहसीलदार धनंजय जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन जनगणनेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि अखेर हे राष्ट्रीय काम वेळेपूर्वी पूर्ण झाले.
ढाकच्या पायथ्याशी तुळशी माळ येथे कातकरी समाजाच्या 17 झोपड्या असून, ढाकमध्ये सुमारे 85 घरांची वस्ती आहे. अनेक घरे मोडकळीस आलेली असून, काही पडीक अवस्थेत आहेत. कळकराई येथेही सध्या केवळ काही झोपड्या, पडीक घरे आणि मंदिर दिसून येते. मात्र, पूर्वी येथे 40 ते 50 ठाकूर समाजाची घरे असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत ग्रामपंचायत वदपचे डेटा ऑपरेटर चंद्रकांत वाघचौरे, प्रगणक हेमंत ठाकरे, विश्वास ठाकरे आणि पर्यवेक्षक वेच्या गावित यांनी परिश्रम घेतले.
पावसाचा सामना करत वाचवले दस्तऐवज
ढाक आणि कळकराई परिसरातील जनगणना पूर्ण करून परतताना पावसाचे संकेत मिळाल्याने शिक्षकांची धावपळ उडाली. कारण, त्यांच्याकडे जनगणनेचे महत्त्वाचे दस्तऐवज आणि ऑनलाईन डेटा भरण्यासाठी मोबाईल होते. पावसात हे साहित्य खराब झाल्यास संपूर्ण मेहनत वाया जाण्याची शक्यता होती. त्यामुळे अवघड डोंगर उतरत त्यांनी विक्रमी वेळेत खाली पोहोचत दस्तऐवज सुरक्षित ठेवले.
वेच्या गावित,
जनगणना हे केवळ सरकारी काम नसून, राष्ट्रीय जबाबदारी आहे. अतिदुर्गम भागात काम करताना अनेक अडचणी आल्या; पण वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आम्ही हे काम वेळेपूर्वी पूर्ण करू शकलो.
पर्यवेक्षक
