| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील 15 दिवसांत रस्त्यांवरील खड्डे न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करणार असल्याचे निवदेन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्याला देण्यात आले आहे. तसेच, आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेले पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे भरण्यासाठी देण्यात येणार असल्याचे देखील निवेदन देते वेळी सांगण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील सर्वच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. परंतु, खड्डे बुजविण्याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने केला आहे. सुरुवातीला गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सव व त्यानंतर दीपावली सणही संपला असून, परिस्थिती जैसे थे च असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या खड्यांविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले आणि कार्यकारी अभियंता एम. एम. धायतडक यांना निवेदन दिले. या निवेदनाच्या माध्यमातून पुढील 15 दिवसांत खड्डे न भरल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा सल्लागार सतीश पाटील, तालुकाप्रमुख शंकर गुरव, अलिबाग विधानसभा मतदारसंघ प्रवक्ते धनंजय गुरव, कार्यालयीन प्रमुख सुरेश झावरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.







