। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे जिल्हा कबड्डी असो.ने उजाळा क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 66व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ठाण्याच्या जिजाई, संघर्ष यांनी महिला गटात विजयी सलामी दिली. तर पुरुषांच्या ब गटात आई गावदेवी, राज मंडळ, अष्टविनायक, ओम काल्हेर, जय बजरंग, ओम ज्ञानदीप यांनी दुसर्या फेरीत प्रवेश केला. वळगांव-भिवंडी येथील जाईबाई काशिनाथ पाटील क्रीडागरीत सुरू झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या सामन्यात ठाण्याच्या जिजाई मंडळाने जांभूळच्या गावदेवी मंडळाचा 20-13 असा पाडाव करीत दुसरी फेरी गाठली. महिलांचा दुसरा सामना देखील एकतर्फीच झाला. त्यात कोनच्या संघर्ष मंडळाने चिंचपाडाच्या राकेशदादा म्हात्रे संघाचा 42-10 असा धुव्वा उडविला. पुरुषांच्या ब गटात आई गावदेवी संघाने भाऊ स्पोर्ट्सला 20-12 असे रोखले ते यश जाधव, गोकुळ पाटील यांच्या चमकदार खेळामुळे. भाऊ स्पोर्ट्सचा हर्षल भोईर चमकला. चिराग शेट्टी, गोरख पवार यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर राज मंडळाने सुदर्शन संघाचा प्रतिकार 27-23 असा मोडून काढला. याच गटात ओम काल्हेरने राजश्री शाहूंचा संघर्ष 42-39 असा संपुष्टात आणला. इतर सामन्यात हुतात्मा शांताराम(ब)ने संजीवनीला 24-16 असे, तर चेरोबाने जय बजरंगला 25-04 असे पराभूत करीत आगेकूच केली. हे सर्व सामने पुरुष ब गटातील होते.