लेखी पत्र देत मागण्या मान्य
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील वाळवंटी ग्रामस्थांना गेले 7 वर्षं पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाला वेळ देत नसल्याने शेकडोच्या संख्येने महिलांसह भव्य महामोर्चा काढण्यात आला होता. तसेच, पाणी पुरवठा कमेटी अध्यक्ष यशवंत पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. सुरुवातीला पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ व पाणीपुरवठा उप अभियंता निहाल चवरकर यांनी उपोषण घटनास्थळी येऊन उपोषणकर्त्यांना पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. परंतु, मुख्य मागण्या मान्य होत नसल्याने उपोषणकर्ते उपोषणावर ठाम राहिले. शेवटी प्रशासनाने नरमाची भुमिका घेऊन मागण्यांचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर पाणीपुरवठा कमेटी अध्यक्ष यशवंत पाटील व त्यांच्या सहकार्यांनी पाणी पिऊन उपोषण मागे घेतले.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, नायब तहसीलदार संजय तवर, पोलीस निरीक्षक नामदेव बडगर, पंचायत समिती विस्तार अधिकारी अशोक दांडेकर, पाणीपुरवठा उप अभियंता निहाल चवरकर, भरत बेलोसे, मनोज कमाने, इन्तिखाब मुकरी, शैलेश पाटील, शब्बीर खतीब, नजीर नाखावाजी, शौकत नाखवाजी आदिंसह शासकीय अधिकारी व वाळवंटी ग्रामस्थ उपस्थित होते.