| कोलकता | वृत्तसंस्था |
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी 2025 हे गगनयान वर्ष म्हणून जाहीर केले आहे. हे वर्ष गगनयान मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत गगनयान मिशनासाठी 7200 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तर जवळपास 3000 चाचण्या अद्याप बाकी आहेत. दिवसरात्र या मिशनची तयारी सुरू आहे. गगनयान मोहिमेला डिसेंबर 2018 रोजी मंजूरी मिळाली होती. भारताची ही पहिली मानवी अंतराळ मोहिम असणार आहे. याद्वारे भारतीय अंतराळवीर पहिल्यांदा अंतराळात पाऊल ठेवतील. हे मिशन यशस्वी झाले तर भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश ठरेल.
गगनयान ही भारताचा पहिली मानवी अंतराळ मोहिम आहे. इस्त्रोने त्यासाठीची तयारी केली आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे भारतीय अंतराळवीराला स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने पृथ्वीच्या कक्षेत पाठवणे आणि सुरक्षितपणे परत आणणे हे आहे. गगनयान मोहिमेसाठी एलव्हीएम 3 या मानवी-योग्य प्रक्षेपण यानाचा वापर केला जाणार आहे.
कोलकता येथे एका कार्यक्रमात बोलताना इस्त्रो प्रमुखांनी स्पाडेक्स मिशनचे कौतुक केले. या मिशनसाठी केवळ 10 किलो इंधन लागण्याची शक्यता गृहित धरण्यात आली होती. पण आता अवघ्या 5 किलो इंधनात ते पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. हे मिशन भविष्यातील अंतराळयानांच्या डॉकिंगसाठी महत्त्वाचे आहे. स्पाडेक्स मिशनद्वारे इस्त्रोने कमी इंधनात यशस्वी डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले आहे. निसार उपग्रह आणि इतर व्यावसायिक व संप्रेषण उपग्रहांचे प्रक्षेपणही 2025 मध्ये नियोजित असल्याचे नारायणन यांनी स्पष्ट केले.
व्योममित्र याच वर्षी अंतराळात
गगनयान अंतर्गत पहिले मानवरहित मिशन याचवर्षी पूर्ण होणार आहे. पहिली मानवरहित मोहिम डिसेंबर 2025 मध्ये व्योममित्र या अर्ध-मानव रोबोटसह प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यानंतर आणखी दोन मानवरहित मोहिमा होतील. या चाचण्या मानवसदृश परिस्थितीत यंत्रणांची कार्यक्षमता तपासण्यासाठी आहेत.
2027 मध्ये मिशन गगनयान
गगनयान ही भारताचा पहिली मानवी अंतराळ मोहिम आहे. 2027 मधील पहिल्या तिमाहीपर्यंत मानवाला अंतराळात पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेत तीन अंतराळवीरांना पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मोहिम तीन दिवस ते एक आठवडा चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे.