जीटीचा 29 धावांनी पराभव; पहिल्या स्थानावर राहण्याचे स्वप्न भंगले
| कोलकाता | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानात गुजरात टायटन्सला 29 धावांनी पराभवाचा मोठा धक्का दिला. ईडन गार्डन्सवरील कोलकाताचा हा 100वा सामना होता. या सामन्यात कोलकाताने 248 धावांचे लक्ष्य गुजरातसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 षटकात 4 बाद 218 धावाच करता आल्या. गुजरातने या सामन्यापूर्वी गेल्या 5 सामन्यांत सलग विजय मिळवले होते. परंतु, त्यांचा हा विजयरथ कोलकाताने रोखला आहे.
गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी डावाची सुरुवात केली. सुरुवातीलाच सुदर्शनने पहिल्या षटकात दोन चौकारांसह सुरुवात केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात मिळून या दोघांनी 27 धावा केल्या. परंतु, तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुदर्शनच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला लागला. त्यामुळे रियायर्ड हर्ट होऊन सुदर्शनला बाहेर जावे लागले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेला निशांत सिंधू देखील पाचव्या षटकात 1 धावेवरच बाद झाला. त्यानंतर मात्र फलंदाजीला आलेल्या जॉस बटलरने कर्णधार शुभमनची भक्कम साथ दिली. या दोघांनी आक्रमक खेळताना तब्बल 128 धावांची भागीदारी केली. त्यात दोघांनी अर्धशतके ठोकली. गिल शतक करेल, असे चित्र असताना 17व्या षटकात तो झेलबाद झाला. त्यामुळे गिल 49 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. त्यामुळे सुदर्शन पुन्हा मैदानात आला. तो आणि बटलर आक्रमक खेळत होते. परंतु, बटलर 19व्या षटकात बाद झाला आणि गुजरातची जिंकण्याची आशा संपवली. बटलरने 35 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तरी पराभवाचा फरक कमी करताना शेवटच्या षटकात सुदर्शन प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याने 18 वे आयपीएल अर्धशतकही झळकावले. तसेच, 3000 आयपीएल धावाही पूर्ण केल्या. तो 28 चेंडूत 53 धावांवर नाबाद राहिला, राहुल तेवतिया शेवटच्या चेंडूवर 2 धावांवर बाद झाला. यावेळी कोलकाताकडून सुनील नरेनने 2 बळी घेतले. तर, सौरभ दुबे आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पुर्वी, कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 247 धावा केल्या. कोलकाताकडून फिन ऍलेनने 35 चेंडूत 93 धावांची खेळी केली. अंगक्रिश रघुवंशीने 44 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या, तर कॅमेरॉन ग्रीनने 28 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद सिराज आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
कोलकाताने जिवंत ठेवले आव्हान
जर या सामन्यात गुजरातने विजय मिळवला असता, तर त्यांनी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले असते. मात्र, कोलकाताने या सामन्यात विजय मिळवत प्लेऑफसाठीचे आव्हान जिवंत ठेवले आहे. आता गुजरातचा साखळी फेरीतील एकच सामना बाकी आहे, तर कोलकाताचे दोन सामने बाकी आहेत. कोलकाताचे 11 गुण असून ते 7 व्या क्रमांकावर आहेत. गुजरातचे 16 गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. मात्र, आता प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांना उर्वरित साखळी सामन्यांमध्ये विजय मिळवावाच लागणार आहे. सध्या 8 संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.






