बोगस मतदारांचा करेक्ट कार्यक्रम; महिनाभर विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम
| रायगड | प्रतिनिधी |
मतदार यादीतील बोगस नावे हद्दपार करून प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम हाती घेतली आहे. 30 जून ते 29 जुलैदरम्यान रायगड जिल्ह्यात प्रशासन थेट मतदारांच्या दारी जाऊन माहिती संकलित करणार असून, घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले जाणार आहे. पात्र मतदारांची अचूक नोंद आणि अपात्र नावांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील 16 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण-2026) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मतदार यादीतील अपात्र आणि बोगस नावे वगळून प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक व अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे.
या मोहिमेसाठी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 3 हजार 185 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. 1 ऑक्टोबर 2026 हा पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला असून, बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन गणना प्रपत्राच्या दोन प्रती वितरित करतील. मतदारांनी त्यामधील माहिती पडताळून आवश्यक तपशील भरून स्वाक्षरीसह संबंधित बीएलओकडे प्रपत्र जमा करणे आवश्यक राहणार आहे. या गणना प्रपत्राच्या आधारेच नव्या मतदार यादीची तयारी केली जाणार असल्याने नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणना प्रपत्राच्या आधारे तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील 2 हजार 790 मतदान केंद्रांशी संलग्न 25 लाख 33 हजार 739 मतदारांची या मोहिमेद्वारे पडताळणी होणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 574 मतदान केंद्रांवरील 6 लाख 84 हजार 95 मतदार, कर्जतमध्ये 362 केंद्रांवरील 3 लाख 57 हजार 255, उरणमध्ये 190 केंद्रांवरील 3 लाख 19 हजार 337, पेणमध्ये 380 केंद्रांवरील 3 लाख 9 हजार 580, अलिबागमध्ये 375 केंद्रांवरील 2 लाख 95 हजार 449, श्रीवर्धनमध्ये 351 केंद्रांवरील 3 लाख 5 हजार 343 आणि महाडमध्ये 393 केंद्रांवरील 2 लाख 62 हजार 680 मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्यात येणार आहे.
सन 2002 च्या मतदार यादीशी सध्याच्या मतदारांची जोडणी करण्याचे कामही या मोहिमेत होणार आहे. त्यामध्ये पनवेल मतदारसंघात 35.11 टक्के, कर्जतमध्ये 58.68 टक्के, उरणमध्ये 76.85 टक्के, पेणमध्ये 77.04 टक्के, अलिबागमध्ये 82.57 टक्के, श्रीवर्धनमध्ये 85.85 टक्के आणि महाडमध्ये 88.05 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि 1 ऑक्टोबर 2026 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरी आल्यानंतर नागरिकांनी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येणार. 1 ऑक्टोबर 2026 हा पात्रता दिनांक निश्चित. रायगड जिल्ह्यातील 2,790 मतदान केंद्रांशी संलग्न 25,33,739 मतदारांची पडताळणी. 3,185 अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी. बीएलओ घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 4 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार. 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध.
मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देणार असल्याने नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करून गणना प्रपत्र वेळेत भरून द्यावे. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत राहणे हीच या मोहिमेची प्रमुख भूमिका आहे.
किशन जावळे,
जिल्हाधिकारी, रायगड
