आझाद मैदानातील आंदोलन तुर्तास मागे

पुढील निर्णय कर्मचार्‍यांचा असेल; सदाभाऊ खोत
। मुंबई । वृत्तसंस्था ।
गेल्या 15 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेलं एसटी कर्मचार्‍यांचं आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं आहे. सदाभाऊ खोत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे. बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचार्‍यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज आझाद मैदानातील आंदोलन तुर्तास मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सरकारने सांगितलं आहे की राज्य सरकार निधी महामंडळाला वर्ग करेल. महिन्याला 10 तारखेच्या आत पगार मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विलिनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे. पण सरकार दोन पावलं पुढे आलं आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला, तर त्यात कामगारांसोबत आम्ही उभे राहू, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. आझाद मैदान येथे सुरू केलेलं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय कर्मचार्‍यांनी घ्यायचा आहे. त्यात आम्ही कर्मचार्‍यांसोबत असू, असं देखील सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
आम्ही आझाद मैदानात त्यांना घेऊन आलो होतो. आम्ही तात्पुरतं आझाद मैदानातलं आंदोलन मागे घेतलं आहे. कामगारांनी हे आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे त्यांनी याबाबतचा पुढचा निर्णय घ्यायचा आहे. कामगारांना न्याय मिळावा हा आमचा हेतू होता. भविष्यात वेतनवाढीसाठी आपण आंदोलन करू शकतो. आंदोलकांनी पुढे आंदोलन सुरू ठेवलं, तर त्याला आमचा पाठिंबा असेल., असं यावेळी सदाभाऊ खोत यांनी नमूद केलं.

Exit mobile version