सुदैवाने जिवीतहानी टळली
| अलिबाग | प्रतिनिधी |
खांदेरी किल्ल्यावरील वेताळाचे दर्शन घेऊन परतणारी बोट समुद्रात पलटी झाल्याची घटना रविवारी घडली आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली. खवळलेल्या समुद्रातील पाण्यामुळे हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे.
अलिबाग तालुक्यातील थळ पासून काही अंतरावर खोल समुद्रात खांदेरी किल्ला आहे. हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असून या किल्ल्यात वेताळ देवाचे मंदिर आहे. या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. साखर-आक्षीमधील काही तरुण रविवारी 31 मार्च रोजी बोटीतून वेताळ देवाच्या दर्शनासाठी गेले होते. देवाचे दर्शन घेऊन झाल्यावर ते परतीच्या मार्गावर निघाले. किल्ल्यापासून काही अंतरावर गेल्यावर खवळलेल्या समुद्रातील पाण्यामध्ये बोट पलटी झाली. बोटीतील सुमारे 15 तरुण पाण्यात पडले. मात्र, त्यांनी पोहत किनारा गाठल्याने सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली असल्याची माहिती समोर येत आहे.