पाच जण सुखरूप
। रायगड | प्रतिनिधी |
उरण करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीच्या तुळजाई नावाच्या मासेमारी करणाऱ्या बोटीला खांदेरी किल्ल्यानजीक समुद्रात कलंडून जलसमाधी मिळाली. या बोटीतील आठ जणांपैकी पाच जण सुखरूप असून तीन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
करंजा येथून तुळजाई मासेमारी बोट शनिवारी (दि. 26) सकाळी मासेमारीसाठी निघाली होती. हवामान खात्याने सागरी किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात मासेमारीला जाण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला होता. तरी देखील भर पावसात लाटांचा मारा सहन करीत कारंजा येथील मनोहर कोळी यांची तुळजाई नावाची बोट मासेमारीसाठी समुद्रात झेपावली होती.
शनिवारी सकाळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसासह लाटांचा मारा या बोटीला सहन झाला नाही. यामुळे तुळजाई मासेमारी बोट खांदेरी किल्ला परिसरातील समुद्रात कलंडली आणि या बोटीला जलसमाधी मिळाली. या बोटीमध्ये नाखवासह एकूण आठ जण होते. बोट बुडणार असल्याचे लक्षात येताच बोटीवरील आठही जणांनी समुद्रात उद्या घेतल्या. आठ जणांपैकी पाच जण पोहत बाहेर आलेले आहेत. ते किरकोळ जखमी असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आहे.
बोटीवरील खलाशी व तांडेल बाहेर आलेले आहेत. यामध्ये हेमंत बळीराम गावंड, संदीप तुकाराम कोळी, रोशन भगवान कोळी, शंकर हिरा भोईर आणि कृष्णा राम भोईर हे पाच जण पोहत किनाऱ्यावर आले आहेत. तर नरेश राम शेलार,, धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील हे तीन खलाशी अद्यापही बेपत्ता आहेत, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. ड्रोनच्या मदतीने किनाऱ्याजवळ बेपत्ता असलेल्या तीन खलाशांचा शोध सुरु आहे.







