अथक प्रयत्नानंतर कलोते धरणात सापडला ‘त्या’ पर्यटकाचा मृतदेह

। रसायनी । वार्ताहर ।
पावसाळ्यात खालापुरातील कलोते धरणावर पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एकाचा मृतदेह सापडला. आकाश सुधाकर नाईक असे मृताचे नाव आहे. याचा मृतदेह सोमवारी सकाळी अथक प्रयत्नानंतर अपघातग्रस्तांच्या मदत टीमला सापडला आहे.

खालापूर तालुक्यातील कलोते धरणावर पर्यटकांची वर्दळ असते. रविवारी (दि.19) नवी मुंबई येथील एका परिवारातील काहीजण कलोते धरणाच्या मधोमध असलेल्या खत्री फार्महाऊसजवळ फिरण्यास आले होते. हे सर्वजण पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने आकाश सुधाकर नाईक रा.पुणे (वय 27) हा पाण्यात बुडाला.

या घटनेची बातमी समजताच खालापूर पोलीस निरीक्षक अनील विभुते व त्यांचे सहकारी अपघातग्रस्तांच्या मदतीला रुग्णवाहिकेसोबत घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पाण्यात शोध घेत असताना अंधार झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी सकाळी सपोनि. कराड त्यांचे सहकारी गडदे, म्हात्रे, घुगे, कांबळे, तसेच मंडळ अधिकारी किरण पाटील, तलाठी अमोल बोराटे टीमसह घटनास्थळी हजर झाले. अपघातग्रस्तांच्या मदतीला या टीमचे गुरुनाथ साठेलकर, खालापूर नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष राजेश पार्टे, संतोष मोरे, अमित गुजरे, दिनेश ओसवाल, हनीफ कर्जिकर, अमोल कदम हे धरणाच्या पाण्यात शोध घेण्यासाठी उतरले. साधारण दोन तासाच्या शोध मोहीमेनंतर आकाशचा मृतदेह हाती लागला.

खत्री फार्महाऊस हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मधोमध असल्याने या धरणात अनेक बळी गेले आहेत. नुकतीच खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी पावसाळ्यात होणार्‍या अपघातस्थळी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या होत्या. तर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी गावचे पोलीस पाटील यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. मात्र येणारे पर्यटक हे अती उत्साही असतात. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अनोळखी जागेत वावरतात. त्यामुळे असे प्रकार घडतात.

Exit mobile version