वनखाते व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाची बोटचेपी भूमिका
तात्पुरत्या दुरुस्तीचे सौजन्य दाखवा; नागरिक संतप्त
| दिघी | वार्ताहर |
कोकणातील श्रीवर्धन तालुक्याला जोडणारा दिघी-पुणे महामार्ग पूर्ण होत आहे. मात्र, गेली पाच वर्षे काम सुरू असताना वेळास येथील रस्त्याला वनखात्याच्या परवानगीचे लागलेले ग्रहण काही सुटले नाही. या अर्धवट रस्त्याचा धोका आता वाढला आहे. येथे जीवघेणे अपघाताची भीती कायम आहे. दुरुस्तीविना रखडलेल्या रस्त्यावर चालणार्या प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय.
दिघी ते माणगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरणचे काम हे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ करीत आहे. त्यासाठी जे.एम. म्हात्रे कंत्राटदार नेमले आहेत. याच मार्गावरील दिघी ते वेळास मार्गाने जाणार्या घाटातील रस्त्याला वन खात्याच्या परवानगीला सुरुवातीपासूनच विलंब होत आहे. मात्र, तात्पुरत्या दुरुस्तीकडे देखील दुर्लक्ष केल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. यातून अवजड वाहतूक सुरळीत होत असली तरी, छोट्या वाहनांचा प्रवास धोकादायक बनला आहे.
रस्त्याच्या परवानगीसाठी महाराष्ट्र राज्य रस्त्ये विकास महामंडळाकडून त्याबाबतचा प्रस्ताव हा वनखात्याकडे अगोदरच पाठवला आहे, असे नेहमीच सांगण्यात येते. याठिकाणी अवजड वाहनांची सुरळीत वाहतूक होत असल्याने अधिकार्यांचेदेखील दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे वनखात्याकडून जमीन अधिग्रहण प्रक्रियेची योग्य ती कार्यवाही वेळेत होत नाही. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, दुचाकी व चारचाकी यांचा प्रवास जिकिरीचं ठरत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिघी, आदगाव, वेळास, कोंडविल आणि दिवेआगर या नावाजलेल्या समुद्र किनारी व पर्यटन स्थळी जाण्यासाठी याच मार्गावरून जावे लागते. मात्र, रस्त्यांवरील अर्धवट कामांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता काँक्रिटीकरण कधी होईल याचं सोयरसुतक संबंधित विभागातील कोणालाच पडले नाही. मात्र, सध्या तात्पुरत्या खड्ड्यांची दुरुस्तीची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.