। महाड । प्रतिनिधी ।
दोन दिवस पडणार्या पावसामुळे महाड शहर आणि परिसरामध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मंगळवारी (दि.5) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील दासगाव भोई वाड्यातील अर्जुन अप्पा पड्याल यांच्या घरावर भिंतीचा कठडा कोसळल्याने घराचे नुकसान झाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे दासगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची पाहणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली व संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
दासगाव भोई वड्यामध्ये 168 घरे आहेत तर एक हजार लोकांची वस्ती आहे. सोमवारी महाड तालुक्याला पावसाने झोडपून काढल्यानंतर मंगळवारी देखील पाऊसाची संततधार सुरूच होती. महाड शहर, दासगाव परिसरात अचानक पुरस्थिती निर्माण होऊन संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सरकारी यंत्रणा सज्ज झाली असता मंगळवारी दासगाव भोई वाड्यात अचानक रहदारीचा रस्ता खचून बाजूला बांधण्यात आलेली संरक्षण भिंत एका घरावर सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कोसळली. त्यावेळी घरामध्ये 3 लोकांचे एक कुटुंब राहत होते. सुदैवाने कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नाही.
2005 मध्ये महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टि होऊन सुमारे 190 लोकांना जीव गमवावा लागला होता. यामध्ये दासगाव गावची मोठी हानी झाली होती. याच भोईवाड्यामध्ये दरड कोसळून 48 लोक मरण पावले होते. त्या वेळेपासून दरवर्षी महसुल विभागामार्फत या ठिकाणच्या लोकांना पावसाळ्यापुर्वी स्थलांतराच्या नोटिसा देण्यात येतात. यावर्षी देखील अशाच प्रकारे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आमदार प्रवीण दरेकर यांनी दासगावची पाहणी केली असता या ठिकाणी कोणती उपाययोजना करावी लागेल, या ठिकाणच्या लोकांना कशाप्रकारे सुरक्षा देता येईल, याबाबत महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांच्यासोबत चर्चा केली. त्याचबरोबर 2005 च्या दासगावमध्ये आलेल्या दरडीमध्ये दिनेश नथुराम उकीर्डे यांचा मुलगा मयत झाला. मात्र दिनेश यांना आज रहाण्यासाठी घर नाही. त्यांना खास बाब म्हणून जिल्हाधिकार्यांकडे चर्चा करुन जागा देण्याचे आश्वासन देखील दरेकर यांनी यावेळी दिले.
भोईवाड्यातील खचलेला जो भाग आहे, तो 150 घरांच्या रहदारीचा मार्ग आहे. पुर आल्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा हा एक मार्ग आहे. सध्या तो बंद झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष घालून ताबडतोब हा मार्ग तयार करून द्यावा.
– दिलीप उकीर्डे, सरपंच, दासगाव