सा.बां. विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
नगराध्यक्षांची शासनाकडे पत्राद्वारे नाराजी
नेरळ | वार्ताहर |
नेरळ-माथेरान घाट रस्त्यात या पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या दरडींसोबत आलेले दगड आजही रस्त्याच्या कडेला आहेत त्याच स्थितीत असून, डोंगरातील अनेक दगड आजही खाली येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे दगड खाली येऊन अपघात होण्याची शक्यता असून, सार्वजनिक बांधकाम विभाग जनतेचे प्राण जाण्याची वाट पाहात आहेत काय? असा सवाल माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी उपस्थित केला आहे.
माथेरान या मुंबईपासून सर्वात जवळ असलेल्या पर्यटन स्थळावर जाण्यासाठी सध्या नेरळ-माथेरान घाटरस्ता हा एकमेव मार्ग आहे. पावसाळा सुरु असून, या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून, त्या दरडींसोबत आलेले दगड आजही रस्त्याच्या बाजूला आहे त्याच स्थितीत आहेत. त्यात डोंगरात रस्त्याच्या वरच्या बाजूला आणखी काही ठिकाणी घरासारखे आकाराचे दगड खाली येण्याची शक्यता आहे. अशावेळी वारंवार तक्रारी करूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग अपघाताला निमंत्रण देणारे दगड बाजूला करण्याची कार्यवाही करताना दिसत नाही. याबद्दल माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी बांधकाम विभाग लोकांचे जीव जाण्याची वाट पाहात आहे काय, असा प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त केला आहे.
माथेरानला सुरक्षित ठेवणे आणि त्याचबरोबर नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणे, ही जबाबदारी फार महत्त्वाची आहे, यासाठी आपण यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती राज्य सरकारला कळविणार आहोत, असे खरमरीत पत्र माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
नेरळ माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात झाल्या आहेत, त्यावेळी डोंगरातून मातीसोबत आलेले दगड हे काही प्रमाणात रस्त्यावर तर काही डोंगरात अडकून पडले आहेत. ते दगड खाली आणण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची गरज आहे.त्यासाठी आम्ही व्हीजेटीआय संस्थेला पत्र पाठवले आहे. त्यांची टीम येऊन पाहिल आणि त्यानंतर दगड कसे काढायचे यावर निर्णय घेण्यात येईल. मात्र, घाटरस्ता सुरक्षित करण्यावर बांधकाम विभागाच्या भर आहे.
अक्षय चौधरी, प्रभारी उपअभियंता, कर्जत सा.बां.