कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा

शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र

। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।

सरकारने शेतकर्‍याला कर्जमुक्ती करुन त्याचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. या मागणीसाठी सर्व शेतकरी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहणार आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुढाकार घेतला आहे. सरकारचं धोरण, डिझेल, खते किटकनाशके यांचा खर्च वाढत चालला आहे. यामुळं शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाढत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

बाहेरच्या देशातून सोयाबीन पेंड व पामतेल आयात केल्याने सोयाबीनचे दर पडले. सोयाबीन उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला. दूध पावडर आयात केल्याने दुधाचे भाव कमी झाले आहेत. सरकारने मका आयात करु लागल्याने मक्याचे दर ढासळले आहेत. यामुळं मका उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. साखर निर्यातीवर बंदी घातल्याने प्रति टनास 800 रुपयाचा ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा तोटा झाला आहे. यामुळेच शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

शेतकर्‍यांना वारंवार अतिवृष्टी , गारपीट , वादळ , अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतीमध्ये मी गुंतवलेली रक्कम आणि शेतीमाल विकून मला मिळालेली रक्कम याच्यामध्ये आरिष्ट दुरावा तयार होत आहे. त्यामुळे शेतीसाठी काढलेले कर्ज मी फेडू शकलो नाही. रोजगार निर्माण करतो याचा बहाणा दाखवून देशातील उद्योगपतींनी राष्ट्रीयकृत बँकेतून लाखो कोटीची कर्जे उचलली व गेल्या 10 वर्षात काही मूठभर उद्योगपतींचे व्यवसाय तोट्यात गेल्याने 14 लाख 35 हजार कोटीची कर्जे राईट अ‍ॅाफ करण्यात आली. तोच न्याय मला का लावला जात नाही असे राष्ट्रपतीला देण्यात येणार्‍या निवेदनात म्हटलं आहे.

Exit mobile version