। कोर्लई । वार्ताहर ।
मागील आठवड्यात हवामान खात्याने हवामान ढगाळ राहील व उष्णता वाढेल असा अंदाज वर्तविला होता. दुपारच्या वेळेत तर अतीउष्णतेमुळे अक्षरशः अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे पर्यटनावर देखील याचा परीणाम झाला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक शहरांचे तापमान 40 अंशाच्यावर गेले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याच महिन्यात मागील आठवड्यात उष्णतेची लाट आली होती. त्यावेळी मुरुडमध्ये तापमानात चढ उतार दिसून येत होता. ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुरुड मधील तापमान काही अंशाने कमी झालेले पहावयास मिळाले. मात्र, पुन्हा वातावरण स्वच्छ होऊन कडक सूर्यप्रकाश पडून वातावरण तापायला सुरुवात झाली. त्यामुळे मुरुडच्या नागरिकांसह पर्यटकांनी देखील घरातच बसून राहणे पसंत केले आहे.