नवीन बस द्या; परिवहनमंत्र्यांना साकडे
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले माणगाव हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण असून, येथे दररोज शेकडो प्रवासी एसटी बसचा वापर करतात. मात्र, माणगाव एसटी आगारात आजही जुन्या, गंजलेल्या आणि वारंवार बिघडणार्या बसगाड्याच धावत आहेत. माणगावपासून 30 किमी अंतरावर असलेल्या महाड आगाराला नुकत्याच काही नव्या बसगाड्या देण्यात आल्या आहेत. मात्र, माणगाव आगाराच्या पदरी नवीन बस गाड्यांअभावी निराशाच आली आहे. परिवहनमंत्र्यांनी दुजाभाव केल्याची भावना तालुक्यातील नागरिक व प्रवासीवर्गातून व्यक्त होत आहे.
माणगाव बस आगारातून हजारो प्रवासी नागरिक परिवहन महामंडळाच्या बसमधून दररोज प्रवास करीत असतात. या आगाराची 14 एप्रिल 2011 मध्ये स्थापना झाली. त्याला 14 वर्षे लोटली. तेव्हापासून आजतागायत जुन्याच गाड्या या बस आगाराला देण्यात आल्या आहेत. त्या सतत नादुरुस्त होत असल्याने प्रवासीही शासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतल्याबरोबर तेथे मोठ्या प्रमाणात नवीन बस गाड्या उपलब्ध करून दिल्या. तर, त्यांच्याच पक्षाचे निकटवर्तीय असणारे आमदार तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या जन्मभूमी असणार्या महाड आगाराला नुकत्याच नवीन बस गाड्या देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येत असणार्या माणगाव आगाराकडे दुर्लक्ष का? असा सवाल आता स्थानिकांमध्ये उमटू लागला आहे. माणगाव आगाराचे कामकाज नियमित सुरू असतानाही, नव्या बसगाड्यांची टंचाई अजूनही कायम आहे.
अपुर्या गाड्यांमुळे अडचणी
माणगाव बस आगार हा रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. स्थानिक तसेच लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी पुरेश्या बसगाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा अवलंब करावा लागतो. परिणामी, एसटी महामंडळाचे उत्पन्न घटत आहे, अपुर्या बसगाड्यांमुळे अडचणी वाढत आहेत.
सद्यःस्थिती असणार्या बस
सध्या माणगाव आगारात 31 बसगाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी 15 सीएनजी व 16 डिझेलवर चालणार्या आहेत. तर, 6 खासगी भाडेतत्त्वावर घेतल्या असून, त्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी वापरल्या जात आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि कोकणातील विविध भागांना जाणार्या-येणार्या गाड्या वेळेवर उपलब्ध नसल्याने अनेकजण खासगी वाहनांकडे वळत आहेत.
… तरच उत्पन्नात वाढ शक्य
माणगाव आगारात कर्मचारी कमी असल्याने असणार्या कर्मचार्यांकडून अतिरिक्त काम करून घेतले जाते. या नवीन 20 गाड्या देण्यात याव्यात व 50 कर्मचार्यांची गरज आहे. त्यानंतर या बस आगाराचे उत्पन्न नक्कीच वाढ होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.