पर्यावरणप्रेमी सागर दाहिंबेकर यांच्या प्रयत्नांना यश
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कोलाड गावातील एका माडाच्या झाडावर सुगरणीने आपले सुरेख घरटे बांधले होते. यात दोन नुकतीच जन्मलेली पिल्ले देखील होती. मात्र पाच दिवसांपूर्वी वार्यामुळे झाडाची फांदी तुटली आणि ते घर खाली पडले. त्यासोबत तिची पिल्ले देखील जमिनीवर आली. या अनाथ व बेघर पिल्लांना येथील प्राणीमित्र सागर दाहिंबेकर यांनी पाच दिवस आपल्या घरी ठेऊन त्यांची सुश्रुषा केली व उडण्यायोग्य झाल्यावर त्यांना सुरक्षित स्थळी सोडून दिले.
घरट्यातील पिल्लांना जीवदान मिळावे यासाठी येथील स्थानिक लोकांनी सागरला संपर्क केला. त्याने घरट्यामध्ये दोन पिल्ले होती. आजूबाजूला पिल्लांच्या आई-वडिलांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत. परिणामी पिल्लांच्या सुरक्षेसाठी थोड्या वेळातच पिल्लांना आपल्या घरी घेऊन गेले. पिल्लांचे वय हे साधारण बारा ते पंधरा दिवसाचे होते. पाच ते सहा दिवसातच पिल्लं स्वतः उडणार होती म्हणून त्यांनी त्यांच्या घरीच पाच दिवसांसाठी पिल्लांना ठेवले व त्यांचा सांभाळ केला. नैसर्गिकरित्या खाऊ घातले. पाच दिवसाने पिल्ले स्वतः उडू लागल्या नंतर पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.