भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम असणाऱ्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, आदिशक्तीचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. मांगल्याचं प्रतिक असणारा हा उत्सव जिल्हाभरात जल्लोष अन् भक्तीमय वातावरणात साजरा होत असून, या उत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील विविध देवीस्थानांचे महत्त्व आणि महात्म्य जाणून घेताना जागृत देवस्थान आणि भविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदेवतांचा अगाध महिमा, त्यांची कीर्ती जाणून घेणे उचित आहे.
चौलमळा गावची आई कृष्णादेवी
| राकेश लोहार | चौल |
कोकण म्हटलं, की समोर येतो तो इथला निळाशार समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या मोठमोठाल्या बागा अन् त्याचबरोबर प्रसिद्ध असणारी देवी-देवतांची प्रसिद्ध मंदिरे. असेच एक अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील प्रसिद्ध असे स्वयंभू कृष्णादेवीचे मंदिर. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या कृष्णादेवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम असणाऱ्या या उत्सवाची धामधूम सुरू असून, आदिशक्तीच्या उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सध्याच्या आधुनिकतेच्या युगात व तरुणाईचे आकर्षण असलेल्या डिस्को दांडियाच्या काळातही येथील नवरात्रोत्सव आपले वेगळेपण टिकवून आहे. या उत्सवाला चौल पंचक्रोशीसह अनेक ठिकाणांहून भाविक आवर्जून हजेरी लावतात. चौलमळा येथील ग्रामदेवी कृष्णादेवीचे मंदिर आकर्षक असेच आहे. मंदिराच्या सभोवताली नारळी-पोफळीच्या झाडांची दाट वनराई असून, गर्द झाडीच्या कुशीत मंदिर वसले आहे. पूर्वीच्या कौलारु असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार करुन आरसीसी पद्धतीचे, सुंदर नक्षीकाम केलेले मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या मध्यभागी संगमरवरी प्रभावळरुपी चौथरा तयार करुन त्यावर ग्रामदेवता कृष्णादेवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. येथील प्रथेनुसार मंदिरातील मूर्तीच्या दैनंदिन पूजाअर्चेचा मान गावातील सर्व ग्रामस्थांना प्रत्येक दिवशी देण्यात येतो.
देवीची दररोज सांजआरती होते. विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने देवीची उपासना केली जाते. नवसाला पावणारी देवी असल्याने इथे नेहमीच भक्तांची गर्दी दिसून येते. मांगल्याचे प्रतिक असलेला नवरात्र उत्सव येथे दिमाखदारपणे साजरा केला जातो. नऊ दिवस येथे कृष्णोदवी युवक मंडळाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवसाला पावणाऱ्या देवीच्या लौकिकामुळे भाविकांची खण-नारळ, साडी-चोळीने देवीची ओटी भरण्यासाठी नऊ दिवस गर्दी उसळते. नवरात्रातीत चौलमळा ग्रामस्थ भजन मंडळाकडून देवीचा जागर केला जातो. कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा चंद्रकांत नवगावकर (थळ-चालमाळ) असून, त्यांना मृदुंगमणी म्हणून विकास पाटील (ढवर) व अजय वाडकर (चौलमळा) साथ करीत आहेत. या भजन मंडळाची धुरा अध्यक्ष अल्पेश म्हात्रे समर्थपणे पेलत आहेत. या उत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. त्यात लहान मुलांसाठी विविध प्रकारचे फनी गेम्स, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, गीतगायन स्पर्धा, फॅन्सी गरबा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदी प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धा आयोजित करण्यामागे लहान मुलांसह तरुणाईच्या कलागुणांना वाव देणे, एवढाच उद्देश असतो. आणि, त्यासाठी चौलमळा युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद अहोरात्र मेहनत घेत आहेत. नऊ दिवस विनातक्रार आपापली नोकरी-धंदा सांभाळून ही सर्व मंडळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. ग्रामस्थ आणि महिला मंडळाचीही त्यांना तेवढीच साथ लाभत आहे. नवरात्रात नऊ दिवस सकाळी आठ वाजल्यापासून दर्शन व देवीच्या वाडी भरण्याचा कार्यक्रम सुरु होतो. ‘वाडी भरणे’ म्हणजे देवीला फुलांनी सजविणे. देवीला नऊ दिवस सजविण्याचे काम अनिता नाईक, ज्योती लोहार, अस्मिता पाटील, निलांबरी नाईक, निलेशा मुकादम आदी महिला हौशीने करीत असतात. विजयादशमीच्या दिवशी ‘सोने लुटणे’ हा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. त्यानंतर रात्री नऊ दिवस आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांचा बक्षीस समारंभ पार पडतो. त्यानंतर या उत्सवाची सांगता होते. नवरात्र उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चौलमळा गावचे अध्यक्ष रवींद्र घरत, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक, उपाध्यक्ष अल्पेश म्हात्रे, महिला मंडळ अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकारी मेहनत घेत आहेत.
जागृत देवस्थान पळसाई
| मंजुळा म्हात्रे | नागोठणे |
नागोठणेपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-गोवा महामार्गानजीक पळसाई देवीचे मंदिर आहे. मंदिर हे गावाच्या पूर्वेस पूर्वाभिमुख असून, देवीच्या नावावरून गावाचे नाव पळस पडले आहे. पावसाळ्यात मंदिराच्या चारी बाजूस निसर्गाने जणू मुक्त हस्ताने उधळण केलेली पाहायला मिळते. विविध रंगाची मनमोहक फुले, चारही बाजूला असणारी उंच झाडे मन मोहून घेतात. मंदिराच्या मागील बाजूस असलेली एक प्राचीन विहीर आणि मंदिराच्या डाव्या बाजूला शंकराचे स्वयंभू मंदिर असे चित्र पाहता केवळ धार्मिकच नव्हे तर, एक प्रसन्नदायी आणि निसर्गरम्य वातावरण मनाला समाधान देणारे ठरते. नवरात्र उत्सव तसेच चैत्र महिन्याच्या काळात पळसाई देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात.
पळसाई देवीची मूर्ती स्वयंभु असून, त्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार पूर्वी या गावातील एका भोपी तथा पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन मी गावाच्या पूर्वेला पिंपळाच्या झाडाखाली वास्तव्यास असल्याचा दृष्टांत दिला. मला तिथून उचलून घेऊन जा, जिथे तू दमशील तिथे मला हळूच उतरून ठेव. मात्र, माझे तोंड पूर्वेला राहील याची काळजी घे.. त्या प्रमाणे पुजाऱ्याने दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखालून ती पाषाणाची मूर्ती काढून डोक्यावर घेऊन जाऊ लागला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर दमून त्याने ती पाषाणी मूर्ती उतरताना जोराने आपटली. मूर्ती आपटल्यामुळे तिचे दोन भाग झाले. देवीने सांगितल्याप्रमाणे उतरवून न ठेवता आपटल्यामुळे देवीचा साक्षात्कार होऊन मूर्तीच्या एका बाजूला पुजारी मृत अवस्थेत पडलेला पाहायला मिळाला. आजही देवीच्या समोरील भागात त्या पुजाऱ्याला स्थान दिले आहे. ज्या ठिकाणी देवीची मूर्ती दोन भाग होऊन पडली होती, त्या ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधण्यात आले आहे. जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी अशी पळसाई देवीविषयी भाविकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे.
सोमजाई मातेची चिंचवली शेकीन गावावर कृपादृष्टी
| संतोषी म्हात्रे | खोपोली |
खालापूर तालुक्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सह्याद्रीच्या या डोंगरदऱ्यांमध्ये अनेक अपरिचित देवी आजही भक्तांचे श्रद्धास्थान बनलेल्या आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त या देवीच्या दर्शनासाठी खोपोली परिसरातील हजारो भाविक आवर्जून दर्शनासाठी येतात. यापैकी नगरपालिका हद्दीतील चिंचवली शेकीन गावाजवळ कर्जत-खोपोली रेल्वेलाईन शेजारी असलेल्या सोमजाई माता मंदिरातील देवीचा ग्रामस्थांना अनेकदा साक्षात्कार झाल्याची आख्यायिका ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात.
शेकडो वर्षांपूर्वी कौलारू वास्तुत या देवीचे स्थान असून, पाच वर्षांपूर्वी गावकीच्या वर्गणीतून मंदिराचे जीर्णोद्वार करण्यात आले आहे. अशी आख्यायिका आहे की, सोमजाई माता पूर्वी चिंचवली शेकीन गावात घोड्यावरून फेरफटका मारीत. दर रविवारी कर्जत येथील धाकच्या भैरी डोंगरावरील तिच्या भावाला भावाला भेटायला जाते, असे प्रवीण जाधव या ग्रामस्थांनी सांगितले. सध्या या मंदिराचे देखभाल ग्रामस्थांसह सविता जाधव, प्रवीण जाधव करीत आहेत. सोमजाई माता देवी पार्वतीचे रूप मानले जाते. नऊ दिवस मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नवसाला पावणारी रत्नाई
| नंदकुमार मरवडे | खांब-रोहा |
रोहा तालुक्यातील धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात नावाजलेल्या मुठवली खु. येथील शिवकालीन स्वंयभू देवी रत्नाई भविनीमाता भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.
नवरात्रीचे नऊ दिवसांत या रत्नाई भवानी मातेच्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सव काळात रोहे तालुक्यासह रायगड जिल्हा तसेच मुंबई, ठाणे व पुणे येथून मोठ्या संख्येने देवीचे भक्त आपले नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी येतात. नवसाला पावणारी व मनातील इप्सित भाव पूर्ण करणारी देवी म्हणून या देवीची ख्याती असल्याने येथे देवीला कळादेखील लावला जातो. देवीने योग्य कळ दिल्यावर तोच कळा अष्टमी येथील बापदेव व रोह्याचे आराध्य दैवत श्री धाविर महाराजांना कळा लावण्याचा प्रघात आहे. रत्नाई भवानी मातेचे मंदिर गाभाऱ्यासह व सभागृही प्रशस्त व भव्यदिव्य स्वरूपात आहे. मंदिरात रत्नाई देवी मध्यभागी असून, तिच्या उजव्या बाजूला वाघजाई, सोमजाई तर डाव्या बाजूला गणपती, विठ्ठल, शिवपिंडी व शिवपिंडी समोर नंदी, चांदसूर्य कळा लावण्याचा उताळा अशी दैवतं वसली आहेत. देवीला कळा लावण्यासाठी रविवार, मंगळवार, गुरूवार व शुक्रवार रोजी भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असल्याचे मंदिराचे पुजारी सुदाम मारूती शिंदे यांनी सांगितले.
भक्तांच्या हाकेला धावणारी वरदायनी
| विश्वास निकम | गोवे-कोलाड |
सुधागड तालुक्यातील उसर येथील ग्रामदेवता वरदायनी देवी ही भक्तांच्या हाकेला धावणारी माता आहे. उसर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर अतिशय निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या वरदायनी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी चारही बाजूनी रस्ता असून, सुधागड तालुक्यातून मढाळी, झाप, आपटवणे, भावसेत येथून रस्ता आहे, तर रोहा तालुक्यातून सुकेळी, खांब, वैजनाथ, विठ्ठल वाडी, राजखलाटी येथून जाण्यासाठी रस्ता आहे. या परिसरातील नागरिक नोकरीनिमित्ताने मुंबई, ठाणे, पुणे येथे जात असतात; परंतु देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते नेहमीच वरदायनी मंदिरात येतात. कारण, सर्व संकट दूर करणारी वरदायनी देवी आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे. पूर्वी उसर गावाजवळ गावठाण होता. तेथे आगरी समाजातील लोक वास्तव्याला होते. तेच देवीची पूजाअर्चा करीत होते. पूर्वापार चालत असलेल्या रुढीनुसार संतोष भगत व भगत कुटुंबीय देवीची पूजा करतात.
निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या मंदिरात साती आसरा, कनाई देवी, भैरी देवी, गणपती, मारुती, शंकराची पिंड, नंदी अशा मूर्ती पहावयास मिळतात. मंदिराच्या पायथ्याला कोंडी नावाचा झरा असून, हा झरा भुयारी मार्गातून राबगाव येथील तांबट डोहात व सुकेळीकडे जाणारा पाण्याचा झरा असून, हे पाणी वरदायनी देवीच्या कृपेने बाराही महिने सुरु असते. याच मार्गानी श्री रामप्रभू सीतेला शोधण्यासाठी निघाले असता येथे वरदायनी देवी प्रकट होऊन सांगितले की, तुझ्या हातून रावणाचा वध केला जाईल, असा वर दिला, त्यामुळे या देवीला वरदायनी देवी असे नाव देण्यात आले. चैत्र पौर्णिमेलाही येथे मोठा उत्सव असतो. देवीच्या दर्शनासाठी पालीतील प्रत्येक आळीतील, तसेच सुधागड व रोहा तालुक्यातील असंख्य नागरिक येत असतात.
पळसदरीची शिवकालीन पळसाईमाता
| संतोष पेरणे | नेरळ |
शिवकालीन अशी पळसाई देवीचे मंदिर हे पळसदरी गावाच्या मागे असलेल्या जंगल भागात असून, मंदिराच्या आजूबाजूला असलेली झाडे यामुळे सतत सावली असते आणि त्यामुळे तेथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे आहे. त्यात पावसाळ्यात धबधबे तसेच तलावामुळे येणारे पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे ग्रामस्थांना पर्यटनावर आधारित व्यवसाय मिळाल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. देवीच्या कृपेने गावात समृद्धी व शातंता आहे, अशी ग्रामस्थांची धारणा आहे.
शिवकालीन पळसाई माता पळसदरीची ग्रामदेवता असून, सर्व समाजबांधव मोठ्या भक्तीभावाने पूजाअर्चा करीत असतात. पळसदरी परिसरातील आदिवासी ठाकूर कातकरी सर्व हिंदू धर्मियांची ग्रामदेवता म्हणून पळसाची देवी प्रसिद्ध आहे. सुमारे 500 वर्षांपूर्वीची सुबक मूर्ती असून, पूर्ण शेंदुराने भरली होती. एका भक्ताने शेंदूर काढण्याचा प्रयत्न केला असता शेंदुराच्या आतमध्ये सुबक मूर्ती असल्याचे दिसून येत आहे. ही देवी शिवकालीन असल्याने त्याकाळात यौवनाने मोडतोड केल्याने मंदिराच्या मागील बाजूस आजही खाणाखुणा दिसून येतात. पळसदरी गाव सह्याद्रीच्या कुशीत दोन डोंगरांच्या मध्ये दरीत वसल्याने व विपुल प्रमाणात पळसाची संपत्ती असल्याने काही लोक पूर्वी पत्रावळीचादेखील व्यवसाय करीत असत. फार पूर्वीपासूनच या पळसाची देवीच्या मंदिरात नवरात्रीत जागरभजन, कीर्तन होत असतो. सन 2012-13साली ग्रामस्थानी मंदिराचा जीर्णोद्वार केला. वैशाख शुध्द पंचमीला पालखी सोहळा उत्सव साजरा होत असतो. नवसाला पावणारी देवी म्हणून देवीची ख्याती आहे.
ग्रामदेवी चंडिका माता
| श्रीकांत नांदगावकर | तळा |
भक्तांच्या हाकेला धावणारी तळा शहराची ग्रामदेवता चंडिका माता जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरातून हजारो भाविक दरवर्षी देवीच्या उत्सवानिमित्त तिच्या दर्शनासाठी येतात आणि संकटकाळी आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभी राहा असे गाऱ्हाणे घालतात. देवीही भक्तांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे, अशी भक्तांची धारणा आहे. घरातील शुभकार्याची पहिली पत्रिका देवीच्या चरणी ठेवण्याची प्रथा आजही तळावासियांकडून जपली जाते. चंडिका भवानीची नवीन मूर्ती पन्हेळीजवळील दगडघुम येथे तयार करवून घेतली. मंदिराचे स्थान गावाच्या पूर्व सीमेस आणावयाचे ठरवून पेंढारू मंदिर तयार केले. मूर्ती दगडघुमहून तळेगाव येथील कोंडजाई मंदिरात भेटीसाठी आणली. तेथून डोणोबा डोंगरातील पद्मावती देवीजवळ भेटीस नेली. येथून तळे येथे आणताना तळेगाव, मालाठे रहाटाड येथील ग्रामस्थ हजर होते. ते डोणोबा येथील देवतांना भेटावयास नेहमी जात.
प्रतिष्ठापना करण्यापूर्वी कळा लावला; परंतु कळा मिळाला नाही. भग्न मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास यजमानांवर आपत्ती येते. अशा समजुतीमुळे प्रतिष्ठापना करण्यास कोणीही तयार नव्हते. अशावेळी पोतदार घराण्यातील रंगशेठ पोतदार यांना दृष्टांत झाला, ‘तुझे पूर्वजांनी माझी प्रतिष्ठापना केली आहे. तू प्रतिष्ठापना केल्यास तुला संरक्षण राहील’. त्या दृष्टांताप्रमाणे घरातील लोकांचा विरोध असूनही त्यांनी भग्न मूर्तीची प्रतिष्ठापना केली. भग्न भाग दिसू नये म्हणून मूर्तीला शेंदूर लावण्यात आला. वर्षातून दोन वेळा शेंदूर लावण्याची परंपरा रंगशेठ घराण्यात सुरू झाली. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीची आराधना केली जाते. दरवर्षी दोन दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये पालखी सोहळा, बारा वाड्यांच्या दिंड्यांचे आगमन, महाप्रसाद यांसह अनेक कार्यक्रम पार पडतात. देवीच्या उत्सवात तळा शहरासह मुंबई, पुणे, ठाणे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
इंद्रायणीची एकविरा देवी
| सुनील ठाकूर | उरण |
आदिमायेचे स्वरूप, कोळी-आगरी समाजाची कुळदेवी आई एकविरा देवी आहे; परंतु अशी आख्यायिका आहे की, इंद्रायणीच्या डोंगरावर एकविरा देवीचे हे पांडवकालीन स्वयंभू स्थान आहे. प्राचीन काळी पाच पांडव वनवास करत असताना या इंद्रायणी डोंगरावर वास्तव्यास होते, तसेच कार्ल्याची एकविरा देवी पण या ठिकाणी ध्यानस्थ होती. पांडवांनी देवीला तेथेच राहण्याची विनंती केली. परंतु, देवीने अट घातली की, एका रात्रीत माझे देऊळ या ठिकाणी बांधा, मी येथेच वास्तव्यास राहीन. पांडवांनी एका रात्रीत देऊळ बांधायला सुरुवात केली.
परंतु, पहाटे देऊळ पूर्ण व्हायच्या आधीच देवीचे वाहन कोंबड्याने बांग दिली आणि पांडव हरले. रागाने भीमाने कोंबड्याला लाथ मारली. तेव्हा क्रोधित झालेल्या देवीने देऊळ व इतर परिसर उद्ध्वस्त केला. देवळाचे काही अवशेष केळवणे, चिरनेर व इतर ठिकाणी अजूनही पाहायला मिळतात. यानंतर देवी कार्ला येथे स्थायिक झाली. देवीचे आजही येथे वास्तव्य आहे. कारण, काही वर्षांपूर्वी कलंबुसरे गावातील सुरेश राऊत या भाविकाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत दिला. त्याप्रमाणे सुरेश राऊत यांनी देवीने सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम करून देवीला बाहेर काढले आणि त्याजागी एका रात्रीत देवीसाठी मंदिर बांधले. आता सुरेश राऊत यांच्या हयातीनंतरही त्यांची दोन्ही मुले सुरेंद्र आणि सुशील आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने देवीचे विविध कार्य यथाविधी संपन्न करतात. ही देवी नवसाला पावणारी, मनातील इच्छा पूर्ण करणारी म्हणून प्रचलित आहे. देवीचा चैत्र उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
लिंबाखालची स्वयंभू भवानी माता
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळजवळील धामोते गावाच्या हद्दीत स्वयंभू भवानी मातेचे स्थान आहे. पंचक्रोशीचे रक्षण करणारी भवानी माता म्हणून ती प्रसिद्ध आहे. ही देवी एका झाडाखाली निवास करून आहे. नेरळ-कळंब रस्त्यावर भवानी मातेचे हे मंदिर आहे. ते केवळ धामोते गावाचे नाही; तर परिसराचे श्रद्धास्थान आहे. धामोते गावातील सर्व रहिवासी आजही शुभ कामे करण्यापूर्वी भवानी मातेला श्रीफळ वाढवितात. शेतीची कामे सुरू करण्यापूर्वी भवानी मातेचे नमन करण्याची प्रथा कायम आहे. तुळजापूर निवासी भवानी मातेला या ठिकाणी श्रद्धेने नमस्कार केल्यास तो त्या ठिकाणी पोहोचतो, अशी आख्यायिका आहे.
असंख्य भक्त नवरात्रोत्सव काळात आवर्जून येथे येतात. लिंबाच्या पुरातन वृक्षाखाली वसलेली भवानी माता अन्य ठिकाणच्या मंदिरांचा विचार करता आगळीवेगळी वाटते. अनेक दशके उभ्या असलेल्या लिंबाच्या झाडाचे महत्त्व म्हणजे ते झाड सूर्याची दिशा पूर्व असो की पश्चिम, देवीला सावली देण्याचे काम हे झाड करीत आहे. भवानी माता कायम झाडाच्या सावलीत विसावलेली असते. धामोते गावातील रहिवासी गेली अनेक दशके या भवानी मातेची पूजाअर्चा करीत आहेत. देवीच्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली आहे. आता ते रहिवासीदेखील देवीच्या या उत्सव सोहळ्यात सहभागी होत असून, वर्षभर तेथे भाविक नित्यनेमाने दर्शन घेण्यासाठी येतात.
नागोठणेकरांचे श्रद्धास्थान जोगेश्वरी माता
| महेश पवार | नागोठणे |
रोहा तालुक्यात असलेल्या अनेक प्रसिद्ध देवतांपैकी एक म्हणजे नागोठणेकरांचे श्रद्धास्थान ग्रामदेवता जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर देवस्थान. या ग्रामदेवतांच्या नवरात्रौत्सव सोहळ्यानिमित्त मंदिराला केलेल्या आकर्षक रोषणाईने मंदिर परिसरात लखलखाट झाला आहे. नऊ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. 16 व्या शतकात नागोठण्यातील तीन तळ्यांच्या मध्यभागी स्थापन करण्यात आलेल्या जोगेश्वरी मातेची एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार नागोठण्यापासून सुमारे दीड किलोमीटर लांब असलेल्या मुरावाडी येथील ताडकर नावाच्या भक्ताच्या स्वप्नात येऊन देवीने सांगितले की, मी येथून पश्चिमेस सागवान डोंगरात आहे. तेथून डोक्यावर आणून मी तुला जेथे जड होईन तिथे माझी स्थापना कर. त्याप्रमाणे डोंगरात गेल्यानंतर देवीच्या आकाराचा एक पाषाण ताडकर यांना दिसला. तो डोक्यावर घेऊन ते मुरावाडीकडे जाण्यास निघाले. नागोठण्यातील तीन तळ्यांजवळ ते आले असता त्यांच्या डोक्यावरील देवी रूपातील पाषाण जड झाला. तरीही हे पाषाण ताडकर मुरावाडीकडे नेण्याचा प्रयत्न करू लागले असता देवीचे अस्तित्व असलेले हे पाषाण एवढे जड झाले की, ताडकर यांना ते तेथेच ठेवावे लागले. अशाप्रकारे तीन तळ्यांच्या मधल्या जागेत जोगेश्वरी मातेची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान भैरवनाथ महाराजांना देवीचे बंधू म्हणून गाभाऱ्यात स्थान देण्यात आले आहे.
श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर देवतांचा सुमारे 500 वर्षांपूर्वीचा इतिहास सांगितला जातो. त्यानंतर अनेक वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी एकत्र येऊन येथे एक कौलारू मंदिर बांधून पहिला जीर्णोद्धार केला. नंतरच्या काळातही मंदिरातील कार्यक्रमासाठी जागा अपुरी पडू लागल्याने देवस्थानचे मुख्य विश्वस्त व नागोठण्यातील तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते दिवंगत तात्यासाहेब टके यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सरपंच नरेंद्रशेठ जैन यांच्या अध्यक्षतेखाली जीर्णोद्धार समिती नेमून ग्रामस्थ व देणगीदारांच्या सहकार्याने 40 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या संगमरवरी मंदिराचा सन 2001 मध्ये दुसऱ्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला. हे देवस्थान जागरूक असल्याने व नवसाला पावणारी देवी म्हणून लोकांमध्ये देवीबद्दल श्रद्धा असून, चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीचा पालखी सोहळा, पालखी सोहळ्या आधी होणारी देवीला बळी (मान) देण्याची प्रथा तात्यासाहेब टके यांनी बंद केल्यानंतर त्याऐवजी श्री सत्यनारायण पूजा सुरु करण्यात आली. याशिवाय मंदिरात तुलसी विवाह, नवरात्रौत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येतो. यांसह मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर सुरु असतात. यासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी व देवीचे भक्त गावी येत असतात. जोगेश्वरी मंदिराला सुंदर परिसर लाभल्याने येथे दररोज सायंकाळी आबाल वृद्धांची गर्दी होत असते.