पुढील चार दिवस उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून हाय अलर्ट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत असून, गुरुवारी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सकाळपासूनच कडक उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारी तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे. विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत उघड्या उन्हात बाहेर पडणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नागरिकांना भरपूर पाणी पिणे, थेट सूर्यप्रकाश टाळणे, हलके व सैल कपडे परिधान करणे तसेच दही, ताक यांसारख्या थंड पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच गरज नसताना घराबाहेर पडणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेच्या या वाढत्या लाटेमुळे येत्या काही दिवसांत नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला सर्वाधिक उष्ण
दरम्यान, राज्यातील इतर भागातही उष्णतेची तीव्रता वाढली असून, अकोल्यात तापमान 44 अंशांच्या पुढे गेले असून, राज्यातीलच नव्हे तर, जगातील उष्णतेचे शहर बनले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात उष्णतेचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे.
काय काळजी घ्यावी
भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ (ताक, लिंबूपाणी, नारळपाणी) प्या
हलके, सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करा
डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा
शक्यतो घरातच राहा आणि थेट सूर्यप्रकाश टाळा
बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा
दही, ताक, फळांचे रस यांसारखे थंड पदार्थ आहारात घ्या
उष्माघाताची लक्षणे (चक्कर, मळमळ, डोकेदुखी) दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
काय टाळावे :
सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान उन्हात जाणे टाळा
जास्त वेळ थेट उन्हात काम करणे टाळा
गरम, तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा
गॅस सिलिंडर किंवा ज्वलनशील वस्तू उन्हात ठेवू नका
शरीरातील पाण्याची कमतरता होईल असे पेय (अति चहा, कॉफी) टाळा
एसीचे तापमान खूप कमी ठेवणे टाळा (अचानक तापमान बदल टाळा)
रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडणे टाळा
लिंबाचे भाव वाढले :
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे बाजारात लिंबाची मागणी वाढली असून, त्याचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सध्या बाजारात 200 ते 300 रुपये किलो दराने लिंबाची विक्री करण्यात येत असून, किरकोळ विक्री प्रतवारीनुसार 20 रुपयांना दोन-तीन अशा प्रकारे विक्री करण्यात येत आहे. नागरिक लिंबूपाण्याचा अधिक वापर करत असल्याने विक्रेत्यांकडूनही दर वाढवण्यात आले आहेत.
शीतपेयांना वाढती मागणी
कडक उन्हामुळे थंड पेयांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी तसेच विविध शीतपेयांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून, दुकाने व फेरीवाल्यांकडे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. 30 रुपये ग्लासप्रमाणे शीतपेयाची विक्री करण्यात येत आहे.
नागरिकांनी दुपारी 12 ते 3 दरम्यान थेट सूर्यप्रकाशात बाहेरील कामे टाळावीत आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याठिकाणी गरजेनुसार पाच ते दहा बेड राखीव ठेवण्यात आले असून, रुग्णांना तात्काळ एसीची सुविधा आणि ओआरएसची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच परिस्थितीनुसार आवश्यक उपचार करण्याची पूर्ण तयारी ठेवण्यात आली आहे.
डॉ. निशिकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड
