। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असलेल्या महाजने, ता.अलिबाग येथील मुंबई मंडळाने गावाच्या विकासाचा ध्यास घेतला असून, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना असा मोलाचा संदेश त्यांनी गावकर्यांना दिला आहे.
मार्च 2006 मध्ये महाजने गावातील मुंबई मंडळाने चाकोरीबाहेर रस्ता निवडून काही धाडसी निर्णय घेतले व गाव स्वावलंबी कसा होईल ह्याच्या दृष्टीने वाटचाल करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला महाजनाई व महामारी पालखीच्या निमित्ताने काही शेकड्यात वर्गणी जमा होत होती व जमा होणार्या वर्गणीतून गावात लोकोपयोगी वस्तू आईच्या चरणी अर्पण करायला सुरुवात केली. 14 वर्षाच्या कालखंडात मंडळाने बर्याच लोकोपयोगी वस्तू गावास भेट देत गावातील लोकांना गरजेच्या वस्तू आपल्याच गावात उपलब्ध करून दिल्या. काही शेकडो रुपयात होणारी उलाढाल 14 वर्षात काही लाखांच्या घरात होऊ लागली.
2020 साल महाजने गावातील लोकांसाठी काही विशेष महत्वाचे ठरले. याच वर्षात महाजनाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. व ह्या वर्षी मुंबई मंडळाने महाजने गावातील ग्रामस्थांसाठी, अंदाजे पाच लाख रुपये महाजने गावाचा हक्काचा वैद्यकीय निधी म्हणून जमा करण्याचा निर्धार करण्यात आला. त्या निधीचा पहिला हप्ता एकावन्न हजार रुपये पालखीच्या दिवशी ग्रामस्थांना देण्यात आला. सदर निधी महाजने गावातील ग्रामस्थांसाठी विनाव्याजी देण्यात येणार आहे.
संकल्प व पूर्तता
करोना महामारीमुळे आलेली आर्थिक मंदी, नैसर्गिक आपत्ती, यामुळे महाजने गावातील बहुतेक कुटुंबांना याची मोठी झळ बसली. हीच गोष्ट ध्यान्यात घेऊन मंडळातील सर्व सभासदांनी सर्वानुमते आपल्या गावातील सर्व विद्यार्थी यांच्या शिक्षणावर महामारीचा कोणताही परिणाम होणार नाही व कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याचा विचार करून जवळपास रुपये एक लाखापर्यंत निधी शैक्षणिक निधी म्हणून गोळा करून गावातील विद्यार्थी यांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. तसेच देवीच्या उत्सवाच्या दिवशी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या वर्षी मुंबई मंडळाने गावातील पाणी टंचाई पाहता महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिले महाजने गाव व बौध्दवाडी आशा दोन गावांना पाणी पुरवठा करुन दिला एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावातील तरुणांनी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यांत आदर्श निर्माण करून दिला.विशेष बाब म्हणजे मंडळाला कोणीही अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा खजिनदार नाही. सर्व सभासद देवीवर श्रद्धा ठेवून निस्वार्थी वृत्तीने मंडळाचे काम करतात.