पोलिसांची पथके तैनात; ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पोही आणि पोशिर गावाच्या मध्यभागी असलेल्या रस्त्याच्या बाजूला निर्जन जागी 28 मे रोजी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्या मृताची ओळख पटविण्यासाठी जळालेला मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. दरम्यान,त्या मृत तरुणांच्या खून करणार्यांना पकडण्यासाठी रायगड पोलिसांची दहा पथके तैनात करण्यात आली आहेत.
मृतदेहाच्या शरीरावरील अवयव यांची रचना बघता तो तरुण 25 वर्षे वयोगटातील असल्याचा आणि मुस्लिम धर्मीय असल्याने बोलले जात आहे. खून करून ओळख पटवता येऊ नये म्हणून जाळण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून त्या तरूणाचा एकतर डोक्यात मारून खून करण्यात आला असावा किंवा त्या तरूणाचा गळा दाबून खून केलेला असावा असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्या तरुणाचे जळालेला अवस्थेतील मृतदेह कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी कर्जत येथील उपजिल्हा रूग्णालयात नेऊन त्या मृतदेहाचे शविच्छेदन करण्यात आले आहे. मात्र त्या मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी सदर मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ओळख पटविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने शवागारात किती दिवस जळालेला मृतदेह ठेवायचा याबद्दल निर्णय घेतला जाईल अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांनी दिली आहे.
मृतदेह कर्जत तालुका हद्दीत टाकण्यात आल्याने आणि तो मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रकार समोर आल्याने रायगड पोलीस सतर्क झाले आहेत. रायगड पोलीस चे अतिरिक्त अधीक्षक अतुल झेंडे आणि पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांच्या मार्गर्शनाखाली पोलिसांच्या टीम आरोपीची ओळख पटविण्यासाठी आणि आरोपीचा खून करणारे यांचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. नेरळ पोलिसांच्या मदतीला कर्जत,माथेरान, खोपोली, खालापूर आणि रसायनी पोलीस ठाणे यांची पथके असून जिल्हा पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि गुन्हे प्रकटीकरण विभाग तैनात करण्यात आली आहेत. नेरळ पोलिसांनी प्रसिध्दी पत्रक काढून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्या मृतदेहाची सर्व माहिती प्रसिद्ध केली आहे. त्या जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाच्या अंगावर व्हिनस कंपनीची अंडरवेअर आणि ग्रे रंगाचा टीशर्ट असून ते देखील जळालेल्या अवस्थेत आहेत. त्याबाबत नेरळ पोलिसांनी आवाहन करून 15 तासाचा कालावधी लोटला तरी नेरळ पोलीस ठाणे किंवा रायगड तसेच ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाणे येथे कोणीही आपला नातेवाईक हरवला आहे याबाबत तक्रार घेवून आलेला नाही. त्यामुळे नेरळ पोलीस ठाणे आणि तपासी पथके यांची कसोटी त्या खुनाचे गूढ उकळण्यासाठी लागणार आहे.
रायगड पोलिसांची फोरॅन्सिक लॅबची टीम आणि श्वान पथक घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले असून शोधाशोध सुरू आहे. तर त्या ठिकाणावरून ठाणे जिल्ह्याची हद्दीजवळ असल्याने मृतदेह आणून टाकून त्यांची ओळख पटवू नये आणि तो मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस यंत्रणा देखील चक्रावून गेली आहे.