। पुणे । प्रतिनिधी ।
गेले दोन ते तीन दिवस राज्यातील काही प्रदेशात पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागांत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं राज्यात पाऊस सुरु आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पुढील चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टी आणि येथील काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासांत किनारपट्टीपासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गडगडटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.