शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी विरोधक आक्रमक

मआविकडून विधान भवन पायर्‍यांवर घोषणाबाजी
| मुंबई | प्रतिनिधी |
बळीराजाला अवकाळीची भरपाई मिळालीच पाहिजे… खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय… शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा… कांद्याला 500 रुपये मिळालेच पाहिजे… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा तेरावा दिवस असून, महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कोकणासह इतरत्र अवकाळी पावसासह गारपीठीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला ‘यलो लर्ट’ दिला आहे. मात्र, राज्यातील सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत, राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले.

कोकणासह इतरत्र दि. 5, 6 व 7 मार्च रोजी अवकाळी पाऊस होऊन सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. त्यामध्ये पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरु झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जी आकडेवारी शासन सभागृहात सांगत आहे, हे केवळ अंदाजाने आणि कार्यालयात बसून दिलेली आकडेवारी आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक विवंचनेत असताना अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट उभे राहिले आहे. आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून, 20 मार्चपासून संपूर्ण राज्याला ‘यलो अलर्ट’ तर 11 जिल्ह्यांना ‘ऑरेज अलर्ट’ देण्यात आलेला आहे.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही’ अशी वक्तव्ये करुन ‘अकलेचे तारे’ तोडून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत, याबाबत विरोधी पक्षाच्या आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Exit mobile version