| खांब | वार्ताहर |
कालव्याच्या पाण्यावर आधारित केली जाणारी उन्हाळी हंगामातील भातशेती चांगलीच बहरल्याने शेतकरीवर्ग समाधानी दिसत आहे. रोहा तालुक्यातील डोलवहाळ बंधा-याच्या माध्यमातून कालव्याच्या सहाय्याने काही भागात उन्हाळी हंगामातील भातशेती पिकविली जाते. उन्हाळी हंगामातील भातशेतीचे पीक हे शेतकरीवर्गाचे हातात असल्याने ते त्यांना चांगले परवडते. तर कालव्याच्या माध्यमातून शेतीला आवश्यक पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याचेही योग्य प्रकारे नियोजन करून आपल्याला आवश्यक असणारी पिके सहजपणे पिकविली जातात. साधारणपणे डिसे. महिन्यात कालव्याचे पाणी उपलब्ध झाले तर साधारणपणे नव्वद ते एकशेवीस दिवसात भातपिके तयार होऊन कापणी लायक होतात. तर कधी पाणी उशिरा मिळाल्याने पुरेसा हंगाम मिळत नसल्याने पहिल्याच येणार्या मोसमी पावसामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता असते. परंतू या वर्षी पाटबंधारे विभागाकडून किमान वेळेत पाण्याचे नियोजन झाल्याने भातशेतीही योग्य पद्धतीशे बहरल्याने शेतकरी वर्ग चांगलाच समाधानी दिसत आहे. तर अधून-मधून दिसणा-या ढगाळ वातावरणामुळे अवकळी पावसाची टांगती तलवारही त्यांच्या डोक्यावर कायम असल्याने अवकाळी पावसाचा धसकाही शेतकरी वर्गाने घेतला आहे.