भारताचा 54 खेळाडूंचा संघ
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोकियो पॅरालिम्पिक 2020 स्पर्धेला 24 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताचे 54 खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. त्यात 40 पुरुष व 14 महिला खेळाडूंचा समावेश असणार असून, हा पॅरालिम्पिकमधील भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ आहे. रिओमध्ये 19 खेळाडू उतरले होते व 2 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्यपदक जिंकले होते. ही भारताची आतापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी होती. या स्पर्धेत भारताचे खेळाडू एकूण नऊ प्रकारात सहभाग घेणार आहेत.
रिओ पॅरालिम्पिक 2016 चा सुवर्ण विजेता उंच उडीपटू मरियप्पन थंगावेलू या स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक असेल. भारताला सर्वाधिक अपेक्षा भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया, संदीप चौधरी व मरियप्पनकडून आहेत. झाझरियाने 2004 व 2016 मध्ये सुवर्ण जिंकले असून, संदीप जागतिक विजेता आहे. या स्पर्धेचे प्रसारण डीडी स्पोर्ट्सवरुन करण्यात येणार आहे.
प्रथमच महिला नेमबाज खेळणार
पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच भारतीय महिला नेमबाज सहभागी होणार आहेत. रुबिना फ्रान्सिस 10 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 व अवनी लेखरा 50 मीटर रायफल 3 पोझिशन एसएच 1 व 50 मीटर रायफल प्रोन एसएच 1 मिश्र प्रकारात खेळेल. 19 वर्षीय बॅडमिंटनपटू पलक कोहली युवा खेळाडू असेल. सर्वाधिक 8 खेळाडू भालाफेकचे खेळतील.
बॅडमिंटन, तायक्वांदोचे पदार्पण
पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटन व तायक्वांदोचा समावेश करण्यात आला. हरविंदर सिंग व विवेक चिकारा स्पर्धेसाठी पात्रता मिळवणारे पहिले तिरंदाज असतील. प्राची यादव भारताची पहिली पॅरा-कोनोइस्ट ठरेल. तायक्वांदोमध्ये अरुणा तंवर खेळेल.
स्पर्धेत एकूण 540 प्रकार
पॅरालिम्पिकमध्ये 136 देशांचे 4400 खेळाडू सहभागी होतील. 13 दिवस चालणार्या स्पर्धेत 22 खेळांचे 540 प्रकार होणार आहेत.