| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र ही शूरवीरांची, कर्तृत्ववानांची, नवनिर्माणाचा ध्यास असलेल्यांची भूमी आहे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांनी हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या बालकांची कामगिरी अन्य बालकांसह सर्वांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारी ठरेल, असे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्या बालकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, स्वयंम पाटील या बालकांसह देशातील ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या सर्व बालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, महाराष्ट्राच्या बालकांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’चे मानकरी ठरताना प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. जळगाव येथील शिवांगी काळे हिने वीरता श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने नवसंशोधनामध्ये, मुंबईतील जिया राय तसेच नाशिकच्या स्वयंम पाटीलने क्रीडा श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ मिळवला आहे. या पुरस्कार विजेत्या बालकांमुळे महाराष्ट्राचा सन्मान वाढला आहे. या बालकांच्या जडणघडणीत योगदान देणार्या त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे, नातेवाईकांचे, मार्गदर्शकांचे, हितचिंतकांचेही अभिनंदन केले.