| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेची दगडी शाळेची संरक्षक भिंत दोन वर्षे उलटूनही अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रायगड जिल्ह्यात 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात जांभळीचे झाड कोसळल्याने संरक्षक भिंत कोसळली होती. मात्र, संरक्षक भिंत अद्यापही बांधण्यात न आल्यामुळे भटके कुत्रे व उनाड गुरे शाळेत घुसून परिसर अस्वच्छ करीत आहेत.
भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत पूर्ण झाले असल्याने या शाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून या शाळेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. या भिंतीची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे पत्र शाळेतर्फे तळा नगरपंचायतीला देण्यात आले होते; परंतु ही शाळा नगरपंचायतीला हस्तांतरित झाली नसल्याने या कामासाठी निधी खर्च करू शकत नसल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, आज विविध पक्षातील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध प्रतिष्ठित नागरिकदेखील याच शाळेत शिक्षण घेऊन मोठे झाले आहेत. मात्र, त्यांच्याकडूनदेखील संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.