आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिका हद्दीत तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना पनवेल महापालिकाचे आरोग्य विभागाचे अधिकारी नागरिकांना स्वच्छताचे नियम पाळण्याबाबत सूचना करताना दिसत आहेत. तसेच ताप, सर्दी, खोकला टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र, शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ बनवून विक्री केली जात आहे. तसेच उघड्यावर मांस विक्री केली जात आहे. तसेच शहरातील बेकायदेशीर खाऊगल्ल्यांची घाण फेरीवाले रस्त्यावर, गटारी टाकतात. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसत आहे.
नवीन पनवेल शहरात रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी बेकायदेशीर टपरीधारक महानगरपालिकेची कुठलाही व्यवसाय परवाना न घेता टपरीमध्ये हॉटेल सुरू केले असून, फूटपाथवर रात्री भांडी धुवून सर्व घाण रस्त्यावर व आजूबाजूच्या गटारात टाकली जात असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. गेंड्याची कातडी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत धंद्याबाबत नागरिकांना अतोनात होणारा त्रास आणि त्या विरोधात असलेल्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. असे असताना पनवेल महानगर पालिकेची कामगिरी जैसे थे आहे. या परिसरात अनधिकृत बांधकामांवर पालिकेचे नियंत्रण नसल्याने त्यात वाढ होत आहे. बेकायदेशीर टपरीधारकांकडून अतिक्रमण विभागातील कर्मचारी हप्ते घेत असल्याचे बोलले जात आहे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना हप्ते मिळत असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिक बोलत आहेत. यामुळे येथे कुठलीही कारवाई होत नाही. याचा त्रास सकाळी कामधंद्यासाठी जाणाऱ्या चाकरमानी, आजूबाजूच्या सोसायटीच्या रहिवासीना तसेच मॉर्निंग वॉकसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
मालमत्ता कर वसुलीबाबत कायदेशीर उद्योगधंदा करणाऱ्या दुकानदारांकडे पनवेल महापालिकाचे पथक दोन ते तीन वेळा फेऱ्या मारुन मालमत्ता कर भरण्याची सक्ती करत आहेत. व्यवसाय परवाना काढायला सांगतात. काही ठिकाणी जप्तीच्या नोटीसा काढतात. तसेच येथील प्रमाणिक करदाते व्यावसायिक यांना स्वच्छतेचे नियम पालिका स्वच्छता अधिकारी सांगून दुकान परीसरात अस्वच्छता दिसली की, कारवाईसुध्दा करतात. मात्र, दुसरीकडे नवीन पनवेल शहरातील सेक्टर 17 येथील वर्दळीच्या परीसरात बेकायदेशीर खाऊगल्ल्यांवर पालिकेने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. पालिका अधिकारी या परिसरात दिवसातून दोन वेळा स्वच्छतादूत हा परिसर स्वच्छ करतात. मात्र, येथील बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. येथील करदात्यांकडून महापालिकेच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.







