। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गडनदी पुल ते धनगराचे पाणी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर या वर्षीच्या पावसाळ्यात प्रवाशांना प्रवास करत असताना कसरत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
या मार्गावरील गडनदी पुलाची दुरवस्था झाली असून, या कामासाठी सन 2017 च्या विशेष देखभाल दुरुस्ती अंतर्गत तरतूद करण्यात आली होती. मात्र, अपरीहार्य कारणास्तव काम न झाल्याने येथील पुलाची स्थिती गंभीर बनली आहे. तसेच, पुलापासून पुढील कदमवाडी, निकमवाडी, शिर्केवाडी फाटा, धनगराचे पाणी आदी ठिकाणी रस्त्याची दुरवस्था प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी मार्च 2025च्या अर्थसंकलपात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी 90 लाख रुपये निधीची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारच्या सध्याच्या योजना आणि धोरणामुळे निधीची उपलब्धता होऊ शकली नाही. त्याचा फटका आता स्थानिक जनतेला बसत आहे.