कशेडी घाटात खचला रस्ता

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावाजवळ रस्ता खचला आहे. त्या भागात खडी पसरून पुन्हा मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील तळकोकणात जाणारी व मुंबई दिशेने जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
याच दरम्यान खेड दिशेने जाणारा ट्रक खचलेल्या रस्त्यापासून पुढे पाच मीटर अंतरावर बंद पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. शासन दरवर्षी या खचलेल्या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करत असून तो पैसा फुकट जात आहे. या ठिकाणी खचलेल्या रस्त्याला लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. 2005 पासून येथील रस्त्याला ग्रहण लागले असून, दरवर्षी सातत्याने या ठिकाणी रस्ता खचण्याचे सातत्य कायम आहे. दरवर्षी शासनाकडून या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो; मात्र पावसाळ्यात मुख्यतः जुलै महिन्यात रस्ता खचण्याचे सातत्य कायम आहे.
या परिसरात अवजड वाहने चढत असताना अक्षरशः चढावरून पाठीमागे घसरून मोठा अपघातही घडू शकतो, अशी शक्यता आहे. याच ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असून त्याकडे डोळेझाक केली जात असल्याचे प्रवासी जनतेतून बोलले जात आहे.

Exit mobile version