औद्योगिक क्षेत्रातील गटारे अवकाळीने तुंबली

प्रदूषण मंडळाचा हलगर्जीपणा

। महाड । वार्ताहर ।

चार दिवस पडणार्‍या अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतकरी आणि नागरिकांचे पुरते हाल होत असतानाच औद्योगिक क्षेत्रात मात्र कारखान्यांचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील गटारे काळया निळ्या रंगाच्या पाण्याने तुंबली आहेत. यापूर्वी ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या पाण्याबाबत तक्रारी झाल्या होत्या त्याठिकाणी असलेल्या कारखान्यांवर कारवाई झाली नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रातील लघु आणि रासायनिक कंपन्यांशी संबंधित व्यवसाय करणार्‍या कंपन्यांकडून दरवर्षी सांडपाणी नदीत अथवा शेजारील नाल्यात सोडण्याचे प्रकार गेली अनेक वर्ष सुरू आहेत. या कारखान्यांवर राजकीय वरद हस्त असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांचे देखील हात कारवाईसाठी पुढे होत नाहीत. कांहीं महिन्यांपूर्वी टायटन कंपनी च्या शेजारील नाल्यात टायटन कंपनीच्या समोरील कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच गटारात सोडले गेले होते. यावेळी तक्रारी झाल्या मात्र सदर सांडपाणी प्रकरणी कारवाई झाली नाही. यामुळे याच ठिकाणी आता देखील रासायनिक सांडपाणी रस्त्यालगत असलेल्या गटारातून थेट जिते टेमघर नाल्यामध्ये गेले आहे. यामुळे जिते गावाच्या शेजारून वाहणारा नाला पूर्णपणे प्रदूषित झाला आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्या औद्योगिक क्षेत्रातील सुदर्शन कंपनीपासून थेट आवश्यक गावापर्यंत पसरलेल्या नदीनाल्यांमध्ये सध्या अवकाळी पावसानंतर वाहणार्‍या पाण्यातून रासायनिक सांडपाणी नदीच्या पाण्यात जाऊन मिसळत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये हा प्रदूषणाचा शिक्का दूर करण्यासाठी महाड उत्पादक संघटनेने प्रयत्न केले होते या प्रयत्नांना काही अंशी यश मिळाले असले तरी औद्योगिक क्षेत्रातील अनेक लघु कंपन्या, रासायनिक क्षेत्राशी संबंधित लघु व्यवसायिक यांच्याकडून जाणीवपूर्वक रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडण्याचा प्रकार केला जातो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. त्यातच महाड औद्योगिक वसाहतीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे आणि या लघु कंपन्या, व्यवसायिक यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील कारवाई करत नाहीत.

Exit mobile version