सदावर्तेना 2 दिवस पोलीस कोठडी
109 जणांना न्यायालयीन कोठडी
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई: ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना शनिवारी (9 एप्रिल) न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य 109 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी मोठा जमाव चालून गेला होता. या जमावाने गेटमधून आत शिरत पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली व तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचे मोठे पाऊल उचलत कोर्टात एसटी कामगारांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. बेकायदा जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचार्यांना दुखापत करण्याच्या उद्देश्याने कृत्य करणे आणि हल्याचा कट रचणे असा कलमांतर्गत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना पुढचे दोन दिवस पोलीस कोठडीत काढावे लागणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहेत. ते समजुतदार आहेत. खुद्द शरद पवार एक प्रतिष्ठित नेते आहेत. त्यामुळे या प्रकारची घटना कुणीही चांगली म्हणणार नाही. अशा प्रकारची घटना होऊ नये, असं मला वाटतं. त्यासाठी आमचं राज्य सरकार लक्ष देईल. – गतसिंह कोश्यारी, राज्यपाल
आम्ही कर्मचार्यांच्याबाबत सुरुवातीपासूनच सहानुभूतीची भूमिका घेतलेली आहे. मागील पाच महिने जरी संप सुरू होता, तरी हा संप शांततेने सुरू होता. राज्य सरकारने आतताई भूमिका घेतली नाही. कर्मचार्यांचे नेते भडकाऊ भाषणं करत असताना देखील, राज्य शासनाने नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली आहे. परंतु, कधी कोणी कायदा हातात घेतला की राज्यशासन हातावर हात धरून बसू शकत नाही. – अॅड.अनिल परब,परिवहन मंत्री
वडापावची हाव अंगलट
संपकरी एसटी कर्मचार्यांना आझाद मैदानावरुन पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.त्यामुळे ते सर्वजण सीएसएमटी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येऊन बसले होते. त्यांनी तिथेही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला कर्मचारी आक्रमक होऊ नयेत म्हणून पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेतली. मात्र काही काळानंतर कर्मचारी ऐकत नसल्याने पोलिसांनी त्यांना 18 क्रमांकाच्या फलाटावर नेलं. अखेर पोलिसांनी शक्कल लढवत वडापावचं आमिष दाखवलं. यानंतर घटनेला वेगळं वळण मिळालं. वडापावची बातमी संपकर्यांमध्ये पसरली. कर्मचार्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी वडापाव मिळेल, असं सांगितलं. सगळ्यांनी 18 नंबर फलाटावर चलाफ असं आश्वासनही दिलं. आणि तेच वडापाव खाण्यासाठी 18 क्रमांक फलाटावर आलेल्या एसटी कर्मचारी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. नंतर पोलिसांनी या कर्मचार्यांना आपल्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांना वडापावची हाव अंगलट आल्याची चर्चा आहे.
सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनावरुन खूप काही कानावर आलं आहे. पण त्याबाबत वास्तव परिस्थिती समोर आल्याशिवाय आम्ही बोलणं योग्य ठरणार नाही. जे कुणी आले होते, ते सगळे सुस्थितीत होते, अशातला भाग नाही. काही वेगळ्या गोष्टी देखील तिथे घडत होत्या. – अजित पवार,उपमुख्यमंत्री