जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास देवमानेंचा मात्र इन्कार
| आंबेत | प्रतिनिधी |
महाराष्ट्रतील अंबाजोगाई येथील नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणत येत असतात. त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यातील काही जिल्ह्यांतून औषध पुरवठा करण्याचे आदेश आरोग्य विभागाने काही जिल्ह्यांना केले होते. मात्र, तेथे करण्यात आलेल्या औषध पुरवठ्यामधील काही औषधे ही बनावट असल्याची माहिती उघड झाली. त्या अकरा जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याचे नावदेखील समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, याबाबत रायगड जिल्ह्यातून अशा कोणत्याही प्रकारची औषधे पुरविण्यात आली नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी कृषीवलशी बोलताना दिली.
धाराशिवला म्रिस्टल कंपनीचा औषधसाठा मिळाला होता तो परभणी, रायगड, रत्नागिरी, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, सिंधुदुर्ग, अमरावती, ठाणे आणि हिंगोली या जिल्ह्यांकडून पाठवला गेल्याची माहिती आहे. यातली रंजक गोष्ट म्हणजे, जेव्हा बीडमधल्या प्रकरणानंतर चौकशीला सुरुवात झाली, तेव्हा बोगस औषधांचं हे रॅकेट अजून खोलवर पोहोचलं.
बनावट औषध पुरवठाप्रकरणी अंबेजोगाई, नागापूर, वर्धा, भिवंडी अशा शासकीय दवाखान्यांमध्येच बनावट औषध पुरवठ्यांची बोगसगिरी समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेल्या अजिथ्रोमाइसिन गोळ्यांचे नमुने गतवर्षी औषध विभागाने तपासणीसाठी घेतले होते. याचा अहवाल वर्षभरानंतर प्राप्त झाला. यात ही गोळी अप्रमाणित असल्याचं समोर आलं. कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस एजन्सीकडून जवळपास 25 हजार गोळ्यांचा पुरवठा 29 जुलै 2023 रोजी रुग्णालयाला झाला होता. मात्र, तपासाअंती या गोळ्या अप्रमाणित असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडाली. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार दिसून आला. दरम्यान, या प्रकरणात औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. बीडच्या अंबाजोगाईतील बनावट औषध पुरवठाप्रकरणी स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यातील विशाल एंटरप्राइजेस एजन्सीचे बिल थांबवण्यात आले असून, एजन्सी ब्लॅक लिस्ट करण्यात आली असल्याचीही माहिती समोर आली आहे.
बनावट कंपन्यांद्वारे महाराष्ट्रातल्या तब्बल 11 जिल्ह्यात गोळ्या-औषधांचं पुरवठा झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. गंभीर म्हणजे, जानेवारीपासून सरकारी संस्थांमधून या गोळ्या-औषधांचा पुरवठा झाला आहे. गेल्या सरकारमधले आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या धाराशिव जिल्ह्यातही बनावट औषधे पुरवण्यात आल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे. सुदैवानं औषध विभागाने तो साठा प्रतिबंधित केल्याने त्याचं वितरण झालं नाही. पण, इतर जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचं वाटप झाल्याचं समोर येतं आहे. बीडमधल्या अंबाजोगाईत सरकारी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातही हा साठा होता. याप्रकरणी सूरत आणि ठाणे या दोन ठिकाणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे सर्वसामान्य लोकांसाठी मोठा आधार मानलं जातं. पण इथं एका अॅटिबायोटिक गोळीत एजीथ्रोमायसिन हा घटकच नसल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रात ज्या पाच बोगस औषधं कंपन्यांकडून 11 जिल्ह्यांत औषधं पुरवठा झाल्याची बाब समोर आल्यानंतर अनेक नवनवीन पुरावे समोर येत आहेत. या औषध कंपन्या केरळ, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये निर्मिती करत असल्याचं समोर आल्यानंतर येथील माहिती राज्याचा औषधं नियंत्रण मंडळाने मागवली असता प्रत्यक्षात या ठिकाणी या कंपन्याच नसल्याचं निदर्शनात आले आहे. यानंतर या कंपन्यांकडून कुठे कुठे औषधे पुरविली गेली असल्याचा अहवाल मागवला असता एकूण 11 जिल्ह्यांत याचा पुरवठा झाल्याचं समोर आले आहे.
चौघांवर गुन्हा दाखल
बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानेच बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. याप्रकरणी सूरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून, राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे. अशातच आता बीडपाठोपाठ वर्धा आणि भिवंडीमध्येसुद्धा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
रायगड जिल्ह्यातूनदेखील ते औषध पुरविण्यात आले होते. परंतु, ज्या पाच कंपन्या समोर आल्या आहेत, त्यापैकी या कंपनीचे एकही औषध पुरविण्यात आले नव्हते. आतापर्यंत रायगड जिल्हा रुग्णालय औषध भांडार यांची केलेली छाननी आणि रेकॉर्ड तपासले असता हे निदर्शनात आले आहे. औषध विभागाला विविध आवश्यक औषधे खरेदी करावी लागतात आणि याची वेगवेगळ्या विविध स्तरावर खरेदी होते. ही औषधे ज्या कंपनीकडून ही औषधे खरेदी केली जातात, त्या कंपनीची विश्वासार्हता पाहून खरेदी करणे गरजेचे आहे.
अंबादास देवमाने,
जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड
