चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
। बुलढाणा । वृत्तसंस्था ।
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दिवाळीच्या मध्यरात्रीला प्रवास करणाऱ्या एका चालत्या ट्रकनं अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे या महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला. चालकानं प्रसंगावधान राखत वेळीच ट्रक रस्त्याच्या कडेला लावल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी या आगीत ट्रक आणि त्यामध्ये असलेल्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यातील वडी गावा नजिक चालत्या ट्रकनं अचानक पेट घेतला. आर्को ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा ट्रक असून तो सुरतहून नागपूरकडे निघाला होता. दरम्यान, या ट्रकला अचानक आग लागल्याचं ट्रक चालकाला आढळून आलं. क्षणाचाही विलंब न करता वाहन चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. समय सुचकतेमुळे सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ट्रकमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या साड्या जळून खाक झाल्या आहेत. लाखो रुपयांच्या साड्या जळून खाक झाल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे.