संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही शेकाप अग्रेसर होता. 1952 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे 28 आमदार निवडून गेले होते, तर शंकरराव मोरे आणि अन्य काहीजण लोकसभेमध्ये निवडून गेले होते. खऱ्या अर्थाने हा कालावधीत शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्णकाळ होता. तोच सुवर्णकाळ परत आणण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्यभर चळवळ उभारली आहे. त्याची नांदी 2 ऑगस्ट 2023 रोजी पालीमधील स्वर्गीय नामदेवशेठ खैरेनगरी येथे होणाऱ्या शेकापच्या 76 व्या वर्धापनदिनी दिसून येणार आहे.
सध्या राज्यातील राजकारण पाहिले तर कोणत्याच पक्षाकडे निष्ठा, नीतीमत्ता, ध्येय, धोरण याचा मागमूस दिसून येत नाही. नागरिकांचादेखील विश्वास त्यांनी गमावला आहे. या परिस्थितीमध्ये शेकापकडे आणि विशेष करुन आमदार जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्रातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, दलित, मुस्लीम, आदिवासी आणि युवा वर्ग फार मोठ्या आशेने बघत आहे. पाली येथे होणाऱ्या विराट सभेमध्ये आमदार जयंत पाटील राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कोणती ऊंर्जा भरणार याकडेच अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शेकाप हा मुळातच समाजातील दबलेल्यांचा आवाज बुलंद करणारा राजकीय पक्ष आहे. शेकापने राजकारण कमी, पण समाजकारण अधिक जोमाने केले आहे. हा शेकापचा इतिहास आहे. स्वर्गीय प्रभाकर (भाऊ) पाटील यांनी या प्रश्नावर अधिक प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा राज्याच्या कानाकोपऱ्यात आजही केली जाते. त्यांच्यानंतर खऱ्या अर्थाने शेकापची धुरा कोणी यशस्वीपणे सांभाळली असेल तर ते म्हणजे आमदार जयंत पाटील हे आहेत. राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणावर आणि राज्यातील सहकारावर त्यांची प्रभावी पकड आहे. आमदार जयंत पाटील यांना वजा करुन कोणी राजकारण करुच शकणार नाही. हे आमदार जयंत पाटील यांनी वेळोवेळी आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. शेकाप हा पक्ष मुळात डावा विचार जपणारा आणि समाजातील सर्व घटकांना शाश्वत विकासाच्या प्रवाहात घेऊन जाणारा पक्ष आहे. शेकापने अद्याप आपली विचारधारा सोडलेली नाही. विचाराधारेच्या विरोधात जाऊन कधीच काम न केल्याने शेकापला काही प्रसंगी राजकारणात फटका बसला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील शेकाप हा घट्टपणे पाय रोवून उभा आहे.
राज्यात सुरू असलेल्या राजकारणाकडे पाहिले तर त्याची पातळी घसरली असल्याचे दिसते. भाजपा सत्तेसाठी काय काय करु शकते हे गेल्या काही वर्षांपासून आपण पाहात आहोत. सत्तेसाठी हपापलेल्या शिंदे गट आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नीतीमत्ता, निष्ठा पार धुळीला मिळवली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये याबाबत कमालीची चीड आहे. या राजकीय पक्षावरील नागरिकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे शेकाप हा उत्तम पर्याय ठरु शकतो, अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये रुजत आहे. हाच धागा पकडून आमदार पाटील यांनी प्रागतिक पक्षांची मोट बांधली आहे. मोठ्या राजकीय पक्षांच्या सोबत जाण्याऐवजी छोट्या राजकीय पक्ष, संघटनांना एका छताखाली आणून जास्तीत जास्त आमदार निवडून कसे आणता येतील याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी ते राज्य पिंजून काढत आहेत. रायगड जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना फोडणाऱ्या शिंदे गटाविरोधात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. कमी-अधिक प्रमाणात नागरिकांची सहानुभूती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागे असली तरी मतदारांसाठी ते चांगला आणि ठोस पर्याय ठरु शकत नाहीत. म्हणूनच शेकापकडे मतदार फार वेगळ्या आशेने पाहात आहेत. शेकापने तातडीने या दिशेने काम सुरु केले आहे. पाली येथे होत असलेल्या शेकापच्या 76 व्या वर्धापन दिनामध्ये शेकापच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये आमदार पाटील कोणती ऊर्जा भरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सर्वसामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्यात फार मोठी दुरी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी शेकापला प्रयत्न करावे लागणार आहेत. युवावर्गाची मोठी फळी उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आगामी काळात हीच युवा शक्ती शेकापची ताकद बनणार असल्याने त्यांच्या मनावर शेकापचा डावा विचार अत्यंत खोलवर रुजवण्यात येत आहे. जुन्या-नव्यांचा संगम घडवून आणण्याची दिशेने शेकापला पुढे सरकावे लागणार आहे.
– आविष्कार देसाई