दोन महिलांची प्रकृती खालावली मात्र उपोषणावर ठाम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले पनवेल तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी, फलाटवाडी, चिंचेचीवाडी ह्या आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थांचे उपोषण आज दुसर्या दिवशी देखील सुरुच होते. या उपोषणादरम्यान दोन आंदोलक महिलांची प्रकृती खालावली असूनही आपल्या आंदोलनावर त्या ठाम आहेत.
दर्शना म्हामणकर आण्ि सुरेखा वाघे असे या आंदोलकांची नावे आहेत. उपोषणाच्या आज दुसर्या दिवशी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने सर्व आंदोलकांची नियमित पाहणी केली. यावेळी त्यांना रक्तातील साखर कमी झाल्याचे आढळून आले. तसेच अनेकांची प्रकृती खालावत असल्याचेही निदर्शनास आले.
मागील 12 वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या 52 वर्ष जुन्या व नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणत्याही जलशुद्धीकरण प्रक्रियेविणा पुरवठा केला जातो. तोही आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास. पाणी पुरवठा विभाग आणि ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशांनाही केराची टोपली दाखवून वरील निर्णयांबाबत कोणतीही कारवाई केलेली नसल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरु करण्यात आले आहे. राष्ट्र सेवा दल संघटनेचे रायगड जिल्हा संघटक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ज्योती पाटील, विजया मांडवकर, रेखा कालेकर, राजेश्री म्हामणकर,दर्शना म्हामणकर, निता नरेश वाघे, मानसी वाघे ,आशा शेडगे, सविता पवार, सुरेखा वाघे, राजेश्री भोसले व ग्रामस्थ बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.